प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 24 – देशातील तृतीयपंथीयांना आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत समावेशक तसेच संयुक्त आरोग्य सुविधांविषयक पॅकेज उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करारावर बुधवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत प्राधिकरणाचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा आणि सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव आर. सुब्रमण्यम यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
हा सामंजस्य करार देशातील अशा प्रकारचा पहिलाच करार असून, या करारामुळे समाजात परिवर्तनवादी सुधारणेचा पाया घातला आहे. देशभरातील सर्व घटकांमध्ये समानता असलेल्या समावेशक समाजाचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. आंबेडकरांचे नाव असलेल्या आंतरराष्ट्रीय केंद्रात या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होणे हे देखील समर्पक आहे, असे डॉ. मांडवीय म्हणाले. प्रमाणपत्र मिळवलेल्या देशभरातील सर्व तृतीयपंथी व्यक्तींना केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य सुविधांचे लाभ मिळतील, असे डॉ. मांडवीय यांनी स्पष्ट केले.
अशांनाच मिळणार लाभ
या योजनेच्या अंतर्गत कार्यरत कोणत्याही रुग्णालयात तृतीयपंथी लाभार्थ्यांना उपचार घेता येतील. केंद्र तसेच राज्य सरकारतर्फे पुरस्कृत अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ न घेणाऱ्या व्यक्तींनाच या योजनेतून लाभ घेता येईल.