एकनाथराव खडसे उर्फ नाथाभाऊंनी अखेर भाजपला रामराम केला. हा निर्णय अनपेक्षित नव्हता. नाथाभाऊ पक्ष सोडून जाणार नाहीत, असे भाजपचे राज्यस्तरीय नेते सांगत होते. कदाचित नाथाभाऊंची कोणतीतरी अडचण त्यांना माहीत असावी. भाजप सत्तेत होता. तेव्हा लग्नाचे आमंत्रण देऊनही खडसेंना जेवायला बसवले नाही. हा अपमानच होता. स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचाच दावेदार मानणाऱ्या नेत्याच्या बाबतीत हे असे झाले की त्याच्या वेदना त्या नेत्यालाच समजतात. अगोदरच्या देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत.
अन्यही काही गंभीर आरोप झाले. असे काही घडल्यावर वातावरण निवळेपर्यंत संबंधित नेत्याला विश्रांती दिली जाते. नाथाभाऊंनाही ती दिली गेली. सरकारकडून जाहीरपणे नाथाभाऊंची पाठराखण एक दोनदा केली गेली. मात्र त्यात जोर नव्हता. सोपस्काराचाच तो भाग वाटला. त्यातून कुठेतरी खडसेंबद्दल संशय गडद केला गेला. चाळीस वर्षे त्यांनी पक्षासाठी काम केले.
मात्र जेव्हा पक्ष स्वबळावर सत्तेत आला तेव्हा चार वर्षे त्यांना त्या सत्तेची ऊब चाखता आली नाही. तक्रार करून झाली. गोंधळ घालून झाला. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दिल्लीत आपली दखल घेतली जाईल अशी त्यांची अपेक्षा होती. तीही फोल ठरली. राजकारणात वेळ एकसारखी असत नाही. स्थित्यंतरे घडत असतात.
आता राज्यातील डाव बदलला आहे. खडसेंनी त्यांच्या स्वभावाच्या विपरीत इतका काळ प्रतीक्षा केली व अखेर योग्य वेळी आपला निर्णय जाहीर केला. त्याबद्दल म्हणजे वेळेची अचूक निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि योग्य पक्षाची निवड केल्याबद्दलही अभिनंदन. इतके पावसाळे पाहिल्यावर हा निर्णय चुकला असता, तर त्यांनाही कदाचित नारायण राणेंसारखे पटलावर असूनही विजनवासातच जावे लागले असते. पण प्रश्न एकट्या खडसेंचा नाही. एकट्या भाजपचाही तो नाही. राजकारण असो अथवा अन्य कोणतेही क्षेत्र असो. त्या त्या क्षेत्राच्या कारकिर्दीत ही वेळ येतेच येते. त्याला कारण त्या व्यवस्थेत प्रबळ झालेल्यांची “अहं ब्रह्मास्मि’ वृत्ती. स्वत:लाच कुरवाळण्याचा आणि महत्त्व देण्याचा सोस.
अशा व्यक्तीचे निर्णय चुकीच्या गृहीतकावर अवलंबून असले तरी त्या व्यक्तीला एकदा अथवा दोनदा यश मिळाले असले की, त्याच्या दृष्टीने त्याचे अर्धकच्चे गृहीतक अन्य लोकांसाठी धर्मग्रंथ ठरतो. सगळ्यांनी त्याचे पालन करावे अशी त्यांची अपेक्षा असते. खडसेंनी जाहीरपणे बरेच आरोप केले आहेत. त्यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश आहे. त्यानंतरही त्यांचा तोंडाचा पट्टा चालणार आहे. फडणवीस “व्हिलन’ होते का नाही, हेही यथावकाश स्पष्ट होईल. मात्र आज तरी खडसेंनी भाजपच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे. पूर्वी पक्षात सामूहिक निर्णय व्हायचे. आता भाजप व्यक्तीकेंद्रित झाला आहे. एका व्यक्तीने निर्णय घ्यायचा अन् तो सर्वांनी मान्य करायचा. फडणवीस जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्यामुळेच पक्ष सोडला, असे खडसेंनी म्हटले आहे. त्यांचे हे निरीक्षण आणि टिप्पणी अगदी योग्य आहे.
ज्या पक्षांमध्ये पूर्वी खऱ्या अर्थाने सामूहिक नेतृत्व होते त्या पक्षांत एकाधिकारशाही निर्माण झाल्यावर असा महत्त्वाकांक्षांचा संघर्ष होतोच. कारण मुळात त्या पक्षाचे नेतृत्व हे काही घराणेशाहीतून आलेले वा लादलेले नसते. त्यामुळे आपल्याला संधी आहे व स्पेसही आहे असे प्रत्येक नेत्याला वाटत असते. घराणेशाहीमुळे नेतृत्व लाभलेल्या पक्षांत अन्य नेत्यांना ती सोय असते. त्या घराण्याच्या वलयाची त्यांना कल्पना असल्यामुळे महत्त्वाकांक्षा असणारी पक्षातील अन्य मंडळी मोठी स्वप्ने पाहत नाहीत. कोणत्या पदासाठी “व्हॅकन्सी’ आहे याची त्यांना जाण असते. जे मिळतेय किंवा मिळण्याची शक्यता आहे, तो बोनसच असतो. मात्र सामूहिक नेतृत्वाचा आव आणत जे पक्ष चालवले जातात तेथे प्रत्येकाला सत्ता हवी असते.
मनासारखे झाले नाही, तर कोणाला तरी उद्वेग व्यक्त करत बंडाच्या पवित्र्यात जावे लागते व पक्षातून बाहेरही पडावे लागते. गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी हे भाजपचे राज्यातील दोन मोठे नेते. त्यांच्यातही सुप्त संघर्ष होता. प्रत्येक जिल्ह्यांत पालिका स्तरावरच्या नेत्यांचीही या दोन नेत्यांच्या गटांत विभागणी झाली आहे. ती आजही कायम आहे. मुंडे गेले.
गडकरीही केंद्रात रमले. तेव्हा प्रदेश भाजपमध्ये एकनाथ खडसेच सगळ्यांत ज्येष्ठ आणि अनुभवी. त्यांनी एखाद्या गोष्टीची आकांक्षा करणे अथवा त्या गोष्टीवर आपलाच नैसर्गिक हक्क आहे, असे त्यांना वाटण्यात काहीच गैर नाही. पण खडसेंच्या या आकांक्षांनाच सुरूंग लावला गेला. त्यांच्यातल्या कथित उणिवा हे जरी त्यातले कारण असले तरी ते पूर्ण सत्य नाही. त्याला कारण पक्षाच्या एकूणच रचनेत झालेला बदल. केंद्रात कोणत्या घराण्याचा वरचष्मा नसताना दोन नेत्यांनी पाहता पाहता पक्ष ताब्यात घेतला. रथी महारथी त्यांच्या झंझावातात टिकू शकले नाही. तेथे प्रादेशिक स्तरावर काम करणाऱ्या नेत्यांची काय पत्रास.
श्रेष्ठीपद मिळालेली व्यक्ती सर्वप्रथम तो जेथपर्यंत पोहोचला आहे, तेथे दुसरा कोणी आव्हान द्यायला येऊ नये म्हणून अगोदर शिडी काढून घेते. आपली मांड घट्ट बसवण्यासाठी स्थानिक सुभेदारांना बळ देते. ते सुभेदार सर्वकाळात निष्ठावंत राहतील आणि आपल्याला आव्हान देण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा इतक्यातच जागृत होणार नाही याची दक्षता घेतली जाते.
प्रत्येक राज्यांत प्रस्थापितांना डावलून असे नवे चेहरे पुढे केले जातात. याला तरूणांना संधीपासून ते योग्यता आणि नेतृत्व क्षमता यांचा मुलामा दिला जातो. वरकरणी काहीही भासवले जात असले तरी अंतस्थ हेतू आपले स्थान अबाधित राखणे हाच असतो. अशात पक्षाच्या खडतर काळात सतरंज्या उचलणाऱ्या नेत्यांना ऐन सुगीच्या दिवसांत डावलले जाते. ते मागे मागे सरकत एकदाची त्यांची पाठ भिंतीला टेकली जाते. त्यांनी बाहेर पडावे हाच त्यांना संदेश असतो. फक्त तो जाहीरपणे सांगितला जात नाही.
खडसेंना तो मिळाला होता व आता त्यांनी पक्षबदल केला. याचा अर्थ त्यांना कोणते पद मिळेल अथवा हवे आहे असे नाही. कदाचित आज ती त्यांची गरजही नाही. मात्र सत्ताधारी पक्षाचे वजनदार नेते म्हणून मिळणारा जुना रूबाब, कवचकुंडले त्यांना यामुळे परत मिळणार आहेत. शिवाय त्यांनी जो पक्ष निवडला आहे, तो पक्षच मुळी शक्तिशाली सुभेदारांचा आहे.
शरद पवार अशा सुभेदारांना एकत्रित ठेवण्यात आणि त्यांच्यासह स्वत:ची ताकद वाढवण्यात वाक्बगार आहेत. त्यांच्या पक्षाचा एखादा अपवाद सोडला तर सगळेच नेते स्वबळावर निवडून येणारे आहेत. राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांप्रमाणे हवेवर चालणारे हे नेते नाहीत. त्यामुळे खडसेंना त्यांच्या खानदेश या प्रभावाच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांतील कमी झालेली ताकद व प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करता येणार आहे. कोणाला न्याय दिला पाहिजे होता किंवा कोणावर अन्याय झाला हा विषय नसतोच. अधिकार आणि महत्त्वाकांक्षा हाच मुद्दा असतो.