भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक खवळले असून, त्याची किंमत पक्षाला आज ना उद्या मोजावी लागेल, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. पंकजांच्या उमेदवारीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आपण प्रयत्न केले. मात्र, केंद्रीय नेत्यांचा त्यांच्यावर काही अन्य जबाबदारी देण्याचा विचार असावा, अशी सारवासारव भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली असली, तरी ते अर्थातच कोणालाही पटण्यासारखे नाही. या पार्श्वभूमीवर, पंकजांच्या समर्थकांनी औरंगाबादमधील उस्मानपुरा भागातील भाजपच्या कार्यालयात गोंधळ घातला आणि नासधूस करण्याचाही प्रयत्न केला.
अर्थात, हा प्रकार निंदनीय असून, भाजपच्या पक्षशिस्तीच्या चौकटीत बिलकुल बसणारा नाही; परंतु “देश बदल रहा हैं’च्या धर्तीवर “भाजप बदल रहा हैं’ असे म्हणावे लागेल. भाजपने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या पाचजणांची उमेदवारी जाहीर केली आहे. मराठा, धनगर, ब्राह्मण, ओबीसी हे जातींचे समीकरण जुळवण्याचा हा प्रयत्न आहे. दरेकर यांच्यावर मुंबै बॅंक घोटाळ्याचा आरोप असून, आपण मजूर असल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी त्यांच्या संपत्तीत सहा वर्षांत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. पक्षाच्या आर्थिक गरजा पुरवण्याची क्षमता असलेल्या प्रसाद लाड यांच्याकडे 152 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
लाड यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीने महापालिकेला पुरवलेल्या कंत्राटी सुरक्षकाने तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने, गेल्या सोमवारीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. लाड व दरेकर यांच्यासारख्या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांना अन्य पक्षांतून भाजपमध्ये आणून मोठे करण्यात आले आहे. इतर पक्षांतून आलेले नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले आहेत.
फडणवीस यांनीच त्यांना पक्षात आणले असल्यामुळे, ते त्यांच्याच आज्ञेत असतात. याउलट पंकजांच्या मागे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा असून, त्या व्यापक जनाधार असलेल्या नेत्या आहेत. गोपीनाथराव यांचे निकटवर्तीय एकनाथ खडसे यांनाही भाजपने सातत्याने डावलल्यामुळे, ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले आणि आता त्यांना त्या पक्षाची विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. शेटजी-भटजींचा पक्ष ही भाजपची ओळख बदलून, गोपीनाथरावांनी तो बहुजनांचा केला. मात्र, बाहेरच्या नेत्यांना पुढे आणून, देवेंद्रजी हे विनोद तावडे, पंकजा मुंडे व अन्य निष्ठावंत नेत्यांना बाजूला करत आहेत, अशी टीका खडसे यांनी केली आहे. मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, असे उद्गार पंकजांनी काढल्यानंतर, देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यापासूनच त्यांना उपेक्षेची वागणूक मिळू लागली. नुकत्याच झालेल्या गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात, दिलेल्या संधीचे सोने करता येते, असे उद्गार काढून, विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी अपेक्षाच त्यांनी व्यक्त केली होती.
गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजांचा पराभव केला असला, तरीदेखील अजूनही त्यांच्या प्रत्येक सभेस गर्दी जमते. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांत त्यांचा जनाधार असून, पंकजांमध्ये एक बंडखोर वृत्ती आहे. आपली उपेक्षा होत आहे, याविरुद्धचा संताप त्यांनी वेगवेगळी आंदोलने करून प्रकट केला आहे. भाजपपासून स्वतंत्र अशी आपली एक ओळख असून, आपण स्वयंभू आहोत, असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कदाचित भाजपच्या धोरणात हे बसत नसेल. हाच अनुभव गोपीनाथ मुंडे यांनाही त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात आला होता आणि ते पक्ष सोडून जाण्याचाही विचार करत होते. पंकजा या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, असे सांगून वरकरणी आपण त्यांचा सन्मान करत असल्याचे देवेंद्रजी दाखवत असले, तरी त्यांनीच पंकजांचा पत्ता कट केला आहे, असाच अनेकांचा समज आहे.
पक्षात पंकजांचे वर्चस्व निर्माण होऊ नये आणि त्या परिषदेवर निवड़ून आल्यास त्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावे लागले असते, असा विचार केला गेल्याचे सांगण्यात येते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देवेंद्रजींच्या विश्वासातील असल्यामुळे, त्या जागेवर पंकजांची निवड कशी होऊ शकेल? आता विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास, पंकजांनी 2024च्या निवडणुकीत परळी विधानसभेतून निवडणूक लढवता आली नसती, असा युक्तिवादही केला जात आहे. वास्तविक दोन वर्षे संधी देऊन, नंतर त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्यास हरकत नव्हती. एकीकडे ओबीसी आरक्षणाचा विषय प्रतिष्ठेचा करायचा आणि त्याचवेळी पंकजांना डावलायचे, यात विसंगती दिसते. गेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी चर्चा होती; परंतु त्यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. मुंडे कुटुंबाचे वर्चस्व संपवण्यासाठी डॉ. कराड यांना मंत्रिपद दिले गेले, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती.
डिसेंबर 2019 मध्ये पंकजा भाजप सोडणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी मी पक्षाला सोडणार नाही, पण पक्षाला जर मला सोडायचे असेल, तर त्याने निर्णय घ्यावा. मी आता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने भविष्यात काम करणार आहे, असे वक्तव्य पंकजांनी केले होते. गेल्यावेळी पराभव झाल्यानंतर मतदारसंघ बांधण्याचा विचार न करता, पंकजांनी सातत्याने पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 2019 साली गोपीनाथ गडावर घेतलेल्या मेळाव्यास चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबन लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल प्रभृती नेते हजर होते.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ज्यांचे दमन करण्यात आले, ते नेते तेव्हा एकत्र आले होते. खडसे यांचा भाजपमधून पद्धतशीरपणे काटा काढण्यात आला आणि आता आम्ही सांगू त्या शर्तीवर पक्षात राहायचे तर राहा, असा संदेश पंकजांना देण्यात आला असावा. समर्थकांमार्फत दंगामस्ती करून किंवा शक्तिप्रदर्शन करून, मोदी-शहा यांच्या भाजपमध्ये कोणालाही आपला डाव साधता येत नाही. त्यामुळे दीर्घकाळ दुय्यम वागणूक मिळाल्यानंतर आता पंकजांनी जो काही कठोर निर्णय घ्यावा लागेल, तो घेतला पाहिजे. अन्यथा पक्षात त्यांची किंमत आणखीच कमी कमी होत जाईल.