भारतीय राजकारणाच्या पटलावर निवडणूक रणनीतिकार म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये ओळख मिळवलेले प्रशांत किशोर यांनी आता कॉंग्रेसची निवडणूक रणनीती रचण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे दिसते. कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर प्रशांत किशोर यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली आणि त्या बैठकीत आगामी निवडणुकीची मोहीम आखण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात येण्याबद्दल बातम्या प्रसिद्ध होत आहेत. दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी अशा प्रकारचे काम करण्यापेक्षा पक्षात सामील व्हावे अशा प्रकारची ऑफरही कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिली आहे. एक व्यावसायिक रणनीतिकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर कॉंग्रेसची ही ऑफर स्वीकारतील की नाही, हे नजीकच्या काळात समजेल. पण यापूर्वीही काही पक्षांमध्ये प्रशांत किशोर यांनी प्रवेश केला होता आणि त्या पक्षांमध्ये गेल्यानंतर संबंधित पक्षांना त्यांनी निवडणुकीच्या मैदानामध्ये यशही मिळवून दिले होते. प्रशांत किशोर कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील की नाही, हा जरी वेगळा भाग असला, तरी कॉंग्रेसने पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पक्षाची निवडणूक रणनीती आखण्याची जबाबदारी दिली आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
खरे तर प्रशांत किशोर यांनी काही वर्षांपूर्वी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर टीकाही केली होती; पण ते सर्व विसरून कॉंग्रेसने पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्याकडे मदत मागितली आहे, हे विशेष आणि किशोर यांनीही मदत करायची तयारी दर्शवली आहे, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये एक निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांनी जी जबाबदारी हाती घेतली होती त्यापैकी एखादा अपवाद वगळता त्यांना सर्वत्र चांगले यश मिळाले आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री करण्यामध्येसुद्धा प्रशांत किशोर यांचाच मोठा वाटा होता. त्यामुळे त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपने प्रशांत किशोर यांच्याकडे जबाबदारी दिली होती आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले आणि नंतरच्या कालावधीमध्ये किशोर यांनी आम आदमी पक्ष किंवा जनता दल या पक्षांसोबत काम करून त्यांना निवडणुकीच्या राजकारणात यश मिळवून दिले होते. पंजाबात 2017 मध्ये कॉंग्रेसला सत्तेवर आणण्यातही प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा मोठा वाटा होता;
पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या विरोधकांसाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांची रणनीती फसली होती आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. नजीकच्या कालावधीत होणाऱ्या काही महत्त्वाच्या विधानसभा निवडणुका किंवा आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांना साकडे घातले असले, तरी कॉंग्रेसला पुन्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये यश मिळवून देण्यासाठी प्रशांत यांनासुद्धा आपले सर्व कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणे कॉंग्रेसने देशातील 370 लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करावे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा या काही राज्यांमध्ये कॉंग्रेसने आघाडी करूनच निवडणूक लढवावी, असेही प्रशांत किशोर यांनी सुचवले आहे. 545 सदस्य असणाऱ्या लोकसभेत सध्या कॉंग्रेसचे सदस्य 50 च्या आसपास आहेत हा आकडा तब्बल सहा पट वाढवण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांना पेलावी लागणार आहे. देशातील जी महत्त्वाची राज्ये लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे योगदान देतात त्या राज्यांमध्ये कॉंग्रेसची स्थिती सध्या कशी आहे, याचाही विचार त्या निमित्ताने प्रशांत किशोर यांना करावा लागणार आहे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही देशातील मोठी राज्ये लोकसभेत कोणाची सत्ता असणार, हे नेहमीच ठरवतात. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचे अस्तित्व अतिशय नगण्य आहे. इतर राज्यांमध्ये भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसची ताकदही कमी आहे. या सर्वच राज्यांमध्ये कॉंग्रेसची ताकद वाढवून निवडणुकीत यश मिळवून देण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांना पेलावी लागणार आहे. ज्या राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेसची सत्ता आहे त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसला चांगले यश मिळते, असे दिसत नाही. ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे तेथेही लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाची चांगली कामगिरी होतेच, असे नाही. या गोष्टींचा विचार प्रशांत किशोर यांना करावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांनी जर एखादी रणनीती ठरवली, तर त्याला संपूर्णपणे पाठिंबा देण्याचा धोरणात्मक निर्णय कॉंग्रेस पक्षाला घ्यावा लागणार आहे. सध्या कॉंग्रेस पक्षाचे काम ज्या प्रकारे चालत आहे ते पाहता कोणताही नवीन प्रयोग करताना विरोध करण्याचे धोरण अनेकांचे दिसते. कॉंग्रेसने प्रशांत किशोर यांच्याकडे जबाबदारी दिली असेल, तर प्रशांत जे काही ठरवतील त्याची अंमलबजावणी कोणताही विरोध न करता किंवा आक्षेप न घेता करणे हेच कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या हातात राहते.
यापूर्वी प्रशांत किशोर यांनी जेव्हा कॉंग्रेसचे काम केले होते तेव्हा त्यांना कॉंग्रेसमधीलच नोकरशाही पद्धतीच्या वृत्तीचा अनुभव आला होता. आधुनिक काळामध्ये निवडणुकीचे राजकारण करत असताना सर्व परंपरा आणि प्रथा बाजूला ठेवून आधुनिक पद्धतीचे राजकारण करायची गरज आहे, हेसुद्धा प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस पक्षाला आणि त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. किशोर यांच्या रणनीतीमुळे ज्या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या राजकारणात यश मिळाले होते त्यांनी आपली सर्व धोरणे आणि परंपरा बाजूला ठेवून प्रशांत किशोर यांनी सुचवल्याप्रमाणे निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली होती. त्या प्रकारची मानसिकता आता कॉंग्रेसलाही तयार करावी लागणार आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने ऑफर दिल्याप्रमाणे प्रशांत किशोर जर पक्षात दाखल झाले, तर त्यांच्या कामावर आपोआपच मर्यादा येणार.
एक व्यावसायिक रणनीतिकार म्हणूनच प्रशांत यांनी कॉंग्रेसला मदत केली, तर त्याचा दोघांनाही फायदा होणार आहे. आजवरचा अनुभव बघता प्रशांत यांनी ज्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता त्या पक्षात ते फार काळ राहिले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा इतर विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवणे हा कॉंग्रेसचा एकच उद्देश असेल तर प्रशांत किशोर पक्षात येवो किंवा न येवो तरीही त्यांच्यावर संपूर्णपणे जबाबदारी देऊन ते सांगतील त्या रणनीतीची अंमलबजावणी कॉंग्रेसला करावी लागणार आहे. कॉंग्रेस आणि प्रशांत यांच्यात नक्की काय घडते, हे आगामी कालावधीत निश्चित समोर येईल. पण निवडणुका दूर असल्या तरी कॉंग्रेस पक्ष भाजपप्रमाणे सक्रिय झाला आहे आणि निवडणुकीच्या मोडमध्ये गेला आहे, ही सुद्धा एक आशादायक बाब म्हणावी लागेल.