पुणे – अनलाॅकच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सर्व व्यवहार हळूहळू सुरू करण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील मंदिरे अद्यापही खुली करण्यात आली नाहीत. यामुळे आता राज्यातील वारकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
वारकरी संप्रदायाचे हभप बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील मंदिरे खुली न केल्यामुळे पत्रकाद्वारे ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली आहे.
बंडातात्या कराडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘नरकचतुर्दशीचे अभ्यंग स्नान आपण भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला म्हणुक करतो. भारतातील सर्व मंदिरे खुली असतांना महाराष्ट्रातील मंदिरे आपल्या नरकासुराने गेले आठ महिने कृष्ण रूपी विठ्ठलाला सत्यभामा रुग्मिणी सह बंदीवासात टाकले असतांना आपण कोणता आनंद साजरा करणार आहात? कोल्हापूर ची महालक्ष्मी, तुळजापूर ची भवानी माहूरची रेणुका व वणीची सप्तश्रृंगी बंदीस्त असताना कोणत्या लक्ष्मीचे पुजन करणार आहात? बळीराजा असुर म्हणून वामनाने त्याचे राज्य घेतले.
येथे असुरांचेच राज्य असताना, कसली बलीप्रतिपदा करता आहात ? या असुरांच्या राज्यात दारूची दुकाने, भाजीमंडई, हाॅटेल्स, ढाबे, विवाह, पार्ट्या, पार्टी मिटिंग, सर्रास चालू आहेत. मात्र मंदिरे, वाऱ्या, भजन, सप्ताहांना पूर्ण बंदी आहे. आणि आपण तरी ही दिवाळी साजरी करणार आहात का ? हिंदूचा कैवारी नास्तिक व अधर्मी असुरांच्या ताब्यात आहे. तो इच्छा असून ही मंदिरे सुरू करू शकत नाही. एवढ्याकरीता आपण दिवाळीच साजरी न करता यांच्या नावाने शिमगा साजरा करा. आंघोळ करायचीच असेल तर याच्या नावाने व गोड खायचेच असेल तर यांच्या चौदाव्याच्या नावाने खा,’ असे हभप बंडातात्या कराडकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
तसेच यंदा दिवाळी साजरी करू नका असे आवाहन देखील बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीनंतर मंदिरे पुन्हा उघडण्याचे संकेत दिले आहेत. नवीन नियमावली जाहीर करून दिवळीनंतर मंदिरे उघडण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.