आग्रा – हाथरस येथील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात निदर्शने करणाऱ्या वाल्मिकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांशी दोन हात करीत त्यांच्यावर तुफानी दगडफेक केली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे हे कार्यकर्ते आणखीनच बिथरल्याचे दिसून आले. या समाजाने आग्रा शहरातील साफसफाईच्या कामावरही बहिष्कार घातला आहे.
या समाजाचे शेकडो निदर्शक शहरात जमले होते त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर मात्र पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर लाठीहल्ला करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करीत म्हटले आहे की, ज्या राज्याने तुम्हाला संसदेत पाठवले आहे त्या राज्यात एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला ठार मारले जात असेल तर तुम्हाला मौन धारण करता येणार नाही.
संपूर्ण उत्तर प्रदेशात आता निदर्शनांची लाट पसरली असून ठिकठिकाणी निदर्शकांना नियंत्रणात आणण्यात पोलिसांना बरेच कष्ट करावे लागत आहेत. दिल्लीत 2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणासारखी धग आता या प्रकरणाने उत्तर प्रदेश सरकारला बसली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.