मुंबई : देशात इंधन दरवाढ आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. त्यातच आता पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरावरून आता शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही, असेही सरकारच म्हणते. मग मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात?,” असा सवाल शिवसेनेने मोदी सरकारला केला आहे.
इंधन आणि गॅसच्या वाढत्या दरांवरून शिवसेनेने सामना अग्रलेखातून काही सवाल करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर मार्च-एप्रिलमध्ये कमी होतील असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी रविवारी म्हटले आणि सोमवारी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली. जनतेला शाब्दिक दिलासादेखील मिळू द्यायचा नाही असा पणच केंद्र सरकारने केला आहे का? सरकार आता म्हणते, पेट्रोलियम उत्पादक देशांना उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे. त्यामुळे जनतेला दरवाढीपासून दिलासा मिळू शकेल.
दरवाढ नियंत्रणाचा हा कोणता प्रकार म्हणायचा? तुम्ही सांगितले म्हणजे तेल उत्पादक देश लगेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवतील, असे आहे का? त्यापेक्षा जे तुम्ही करू शकता ते करा. तुम्ही दर कमी करू शकता, दरवाढीला लगाम घालू शकता. मात्र ते करायचे नाही आणि भलतेच सांगून मोकळे व्हायचे. याआधीही ”थंडी होती म्हणून इंधन दरवाढ झाली, आता थंडी कमी झाली असल्याने दरही कमी होतील” असे म्हटले गेले. ही बनवाबनवी करण्यापेक्षा दर नियंत्रण करा,” अशा शब्दात शिवसेनेने पेट्रोलियम मंत्र्यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतला आहे.