Akshaye Khanna | Arshad Warsi – सध्या सोशल मीडियावर अभिनेता अक्षय खन्ना याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ‘रेहमान डकैत’ या भूमिकेतील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याचे वेड लावले आहे. अनेक वर्षांनंतर अक्षयला मिळालेले हे यश पाहून त्याचे चाहते कमालीचे आनंदात होते. मात्र, याच काळात अक्षय खन्ना एका मोठ्या वादात अडकला असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या ‘दृश्यम ३’ या चित्रपटातून अक्षय खन्नाने तडकाफडकी माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानधनाच्या मुद्द्यावरून त्याने हा निर्णय घेतल्याचे समजते. अक्षयच्या या निर्णयामुळे निर्माते कुमार मंगत पाठक चांगलेच संतापले आहेत. ऐनवेळी चित्रपटातून बाहेर पडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी अक्षयला कायदेशीर नोटीस बजावली आहे. “यशाची हवा अक्षयच्या डोक्यात गेली आहे,” अशा कडक शब्दांत निर्मात्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अर्शद वारसीने सांगितली पडद्यामागची बाजू ! अक्षय खन्नाच्या या वागण्यावर चर्चा सुरू असतानाच, त्याचा जुना सहकलाकार अर्शद वारसी याने एका मुलाखतीत अक्षयच्या स्वभावावर भाष्य केले आहे. अर्शद म्हणाला “अक्षय हा एक उत्तम अभिनेता आहे यात शंकाच नाही. पण तो त्याच्या स्वतःच्या विश्वात मग्न असतो. त्याला जगाची किंवा इतर लोक काय विचार करतात याची पर्वा नसते. तो त्याच्या अटींवर आयुष्य जगतो आणि त्याला कधीच प्रसिद्धी किंवा पीआरची गरज भासली नाही. तो सुरुवातीपासूनच असा स्वभावाचा आहे.” असं तो म्हणाला. अक्षय खन्नाने चित्रपट सोडल्यानंतर आता त्याची जागा एका ताकदीच्या अभिनेत्याने घेतली आहे. ‘दृश्यम ३’ मध्ये आता अक्षय खन्नाऐवजी अभिनेता जयदीप अहलावत झळकणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढच्या वर्षापासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, अभिनेता अर्शद वारसी आणि अक्षय खन्ना यांनी यापूर्वी ‘हलचल’ आणि ‘शॉर्टकट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अक्षय खन्नाच्या या वादामुळे बॉलिवूडमध्ये सध्या दोन गट पडले आहेत. एका बाजूला त्याचे चाहते त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे निर्मात्यांच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागत आहे.