मुंबई : देशातून काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी पक्षाने आपल्याच तळागाळातील कार्यकर्त्यांना बाजूला सारून स्वतःला कार्यकर्तेमुक्त पक्ष बनवले आहे. भाजप आता बाहेरील लोकांच्या हातात गेला असून, तो आपल्या मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. बुलढाणा येथे सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. सपकाळ म्हणाले, राज्यात सुरू असलेल्या निवडणुकांत भाजपमध्ये गोंधळ उडाला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून इतर पक्षांतून नुकत्याच आलेल्या उमेदवारांना तिकिटे देण्यात आली आहेत. ही नाराजी संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना बाजूला सारण्यात आल्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती दिसून येईल. मूळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून पक्ष आता बाहेरील लोकांच्या हातात गेला आहे. पक्षाचे नियंत्रण लवकरच नागपूरच्या रेशीमबागेतून नव्हे, तर उद्योगपतींकडून केले जाईल. २०२६ हे वर्ष काँग्रेस पक्षासाठी संघटनात्मक पुनर्बांधणीचे वर्ष असणार आहे. डिसेंबरपासूनच तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होताना पाहत आहोत. नवीन वर्षात वैचारिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकता मजबूत करण्यावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले.