अमरावती : महाराष्ट्रात पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याचा थेट परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर झाला असून गुन्हेगारी वाढली आहे, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी केला. अकोल्यात काँग्रेस नेते हिदायतुल्ला पटेल यांच्या हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्याची त्यांनी मागणी केली. येथील पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी पटेल यांना श्रद्धांजली वाहून हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हिंसक गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, अवैध वाळू उपसा आणि जमीनकब्जा टोळ्या राज्यभर मोकाट असून गुन्हेगारी गावांपर्यंत पसरल्याचा आरोप त्यांनी केला. हिदायत पटेल यांची हत्या ही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची दयनीय अवस्था दिसत असल्याचे ते म्हणाले. पोलिसांच्या माहितीनुसार, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्ला पटेल (६६) यांच्यावर मंगळवारी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मोहला गावात नमाजानंतर जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हल्ला झाला. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर लोकशाही कमजोर केल्याचा आरोप करत निवडणुकांत पैशांचा गैरवापर, बोगस मतदान, धमक्यांमुळे बिनविरोध विजय आणि प्रशासनावर दबाव टाकल्याचे दावे केले. भाजप आणि एआयएमआयएममध्ये गुप्त समझोता असल्याचा आरोप करत एआयएमआयएमला भाजपची ‘बी टीम’ असल्याचेही ते म्हणाले.