राजगुरूनगर – खेड तालुक्यांत गेल्या 24 तासांत 55 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर आळंदीतील 92 वर्षीय वृद्धांचा तर चाकण येथील 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याने तालुक्यात बळींचे अर्धशतक झाले आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
तालुक्यात बाधितांचा आकडा 1946 तर मृतांची संख्या 50 वर पोहोचली आहे. दरम्यान, राजगुरूनगर शहरात आज 16 जण करोना पॉझिटिव्ह सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सर्वाधिक संख्या सापडल्याने शांत असलेल्या राजगुरूनगर शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण (11), आळंदी (2), राजगुरूनगर (16) अशा तीन नगरपरिषदांमिळून 29 तर ग्रामीण भागातील मुरकुंडी (1), निघोजे (1), कुरूळी (2), मेदनकरवाडी (1), चिंबळी (1), कान्हेवाडी (2), आंबेठाण (1), काळूस (2), शेलपिंपळगाव (1), शेलगाव (1), धानोरे (2), मरकळ (4), भोसे (1), चऱ्होली (2), राक्षेवाडी (2), कनेरसर (1), रेटवडी (1) या 17 गावांत 26 अशा एकूण 55 बाधित आढळले आहेत.
तपशील…एकूण बाधित…करोनामुक्त…एकूण मृत्य…उपचार सुरू…24 तासांत बाधित
ग्रामीण क्षेत्र…1142…957…26…159…26
चाकण न.प…410…340…13…57…11
आळंदी न.प…189…161…8…20…2
राजगुरूनगर न.प…205…168…3…34…16
एकूण…1946…1626…50…277…55