तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ।। 72 ।। श्री ज्ञानेश्वरी, अध्याय आठवा संत ज्ञानेश्वर माऊली येथे सामान्य माणसाला मरणानंतर पुढे मिळणाऱ्या गतीसंबंधी विचार प्रकट करतात.
अंतकाळी मरणाचे वेळी जी काही एक वस्तू जीवाच्या समोर येऊन उभी राहते किंवा ज्या गोष्टीचे मृत्यूसमयी सातत्याने स्मरण चालू असते तीच वस्तू तो पुढील जन्मात होतो. ते त्याला कोणत्याही प्रयत्नाने चुकविता येत नाही. जोपर्यंत मनुष्य जागा आहे, तोपर्यंत ज्या एका वस्तूच्या चिंतनाने संस्कार तयार होतात,
त्याच संस्कारात झोप लागताच चिंतन केलेली वस्तू स्वप्नात दिसते. त्याप्रमाणे जिवंतपणाच्या कालापासून, अर्थात जन्मल्यापासून जो पदार्थ भोगल्यानंतरही आवडल्याप्रमाणे चित्तात संस्कार रूपाने उरतो, तोच संस्कार रूपात असलेला पदार्थ मरणाच्या मर्यादेपर्यंत अधिकाधिक होऊ लागतो. म्हणजेच जी गोष्ट जिवंतपणी आवडीने मनात राहते, तीच मरणाच्या वेळी सतत मनात येते.