आणि मीवांचूनि कांहीं। आणिक गोमटें नाहीं। ऐसा निश्चयोचि तिहीं। जयाचा केला।।
शरीर वाचा मानस। पियालीं कृतनिश्चयाचा कोश। एक मीवांचूनि वास। न पाहती आन।।
श्री ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात ओवी क्र. 604 ते 611 यामध्ये भगवंताच्या अनन्य भक्तीबद्दल सांगतात. परमेश्वराविषयी अनन्य भक्ती असावी.
देवापेक्षा चांगले दुसरे काहीच नाही, असा मनाचा निश्चय करावा. काया-वाचा-मनाने सर्वस्वी देवाचे ध्यान करावे. भगवंताला वाटते भक्ताने अगदी माझ्या सन्निध यावे व माझ्याबरोबर बसावे. आपल्या पतीकडे जाण्यास पतिव्रता स्त्रीला जसा संकोच वाटत नाही,
त्याप्रमाणे मजकडे येण्यास भक्ताला संकोच वाटू नये किंवा गंगाजळ ज्याप्रमाणे समुद्रात मिळून मिळतच राहते, त्याप्रमाणे तो मी होऊन मला सर्वस्वी भजत राहतो. याप्रमाणे जो अनन्यपणे मला वरतो तो मूर्तिमंत ज्ञानच होय.