अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात क्वालिफायर 2 ची लढत होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो येत्या रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
शुभमन गिलच्या आक्रमक शतकाच्या जोरावर गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 233 धावांचा डोंगर उभारला आहे. शुभमन गिलशिवाय साई सुर्दशन आणि हार्दिक पंड्या यांनी आक्रमक फलंदाजी केली. मुंबईला विजयासाठी 234 धावांची गरज आहे.
सामन्यास पावसामुळे उशीर झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत गुजरातला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. शुभमन गिलने 60 चेंडूत 129 धावांची खेळी केली. 17व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याला आकाश मधवालने टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 10 षटकार लगावले.
गिलचे हे चार सामन्यातील तिसरे शतक आहे. साखळी फेरीतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली. गिलशिवाय साई सुदर्शनने 31 चेंडूत 43 धावा केल्या. तो निवृत्त झाला. कर्णधार हार्दिक पंड्याने 13 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. रिद्धिमान साहाने 16 चेंडूत 18 धावा केल्या. रशीद खानने दोन चेंडूत नाबाद पाच धावा केल्या.
ईशान किशन मैदानाबाहेर..
मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन 16व्या षटकाच्या अखेरीस जखमी झाला. मैदानावर त्याची ख्रिस जॉर्डनशी टक्कर झाली. जॉर्डनचा कोपर किशनच्या डोळ्याला लागला. त्यानंतर इशान मैदानाबाहेर पडला.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत आकाश मधवाल आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. मधवाल याने 4 षटकात 52 तर चावला याने 3 षटकांत 45 धावा दिल्या.