अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एका दिवशी पाच मुलांना अंगणवाडीत बोलविण्याच्या सरकारच्या निर्णयास विरोध
पिंपरी – एकात्मिक बालविकास सेवा योजना महराष्ट्र राज्य यांनी अंगणवाडी केंद्र उघडण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामध्ये अंगणवाडी केंद्रातील बालकांचे ग्रोथ मॉनिटरिंग करण्यासाठी एका दिवशी पाच-पाच मुलांना केंद्रात बोलवावे. मात्र, करोना विषाणूच्या धोक्यामध्ये अशा प्रकारे लहान मुलांना केंद्रामध्ये बोलविणे धोक्याचे आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्र तूर्तास सुरू करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
त्यानुसार, सध्या ग्रामीण व अर्धनगरी भागात अंगणवाडी कर्मचारी नियमितपणे गृह भेटी देत आहेत. अंगणवाडीतील मुलांचे लसीकरण सुरू आहे. या वेळी मुलांचे वजन आणि उंची मोजण्यात येत आहे. त्याची नोंद केली जात आहे. शक्य त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका शिक्षण देतात.
आहार वाटपाचा अपवाद वगळता अंगणवाडी केंद्र न उघडता ही कामे अंगणवाडी कर्मचारी करीत आहेत. शहरी भागामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका त्यासोबतच लाभार्थ्यांना बाहेर फिरणे अशक्य झाले आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी अंगणवाडी खासगी जागेत भरविल्या जातात. करोनामुळे त्याठिकाणी जागा मालकांनी बंदी केली आहे.
मुळे अंगणवाडी उघडणे शक्य नाही. अशा अवस्थेत अंगणवाडी केंद्रात रोज पाच मुलांना, गरोदरमाता, स्तनदा मातांना बोलावले तरी ते येण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे हा अंगणवाडी केंद्रातील बालकांचे ग्रोथ मॉनिटरिंग सुरू करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने एम. ए. पाटील, दिलीप उटणे, शुभा रशीम, भगवान देशमुख, कमल परुळेकर, पाटील, सुवर्णा तळेकर यांनी केली आहे.