नवीन महाबळेश्वरच्या विकासाची शास्त्रीय मांडणी गरजेची; पायाभूत सुविधांचे बळकटीकरण व्हावे
सातारा – ‘स्ट्रॉबेरी’चे माहेरघर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरशेजारीच नवे महाबळेश्वर निर्माण करण्यात येणार आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली नैसर्गिक संपती व प्राण्यांच्या अधिवासावर टाच येऊ लागल्याने दुर्गम भागातील प्रकल्पांना विरोध वाढला आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटनवाढीला वाव, पण इच्छाशक्तीचा अभाव, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सातारा, जावळी व पाटण या तीन तालुक्यांमधील 52 गावांची 37 हजार 258 हेक्टर जमीन नवीन महाबळेश्वरसाठी अधिग्रहीत होणार असल्याने पर्यावरणप्रेमी संघटना सतर्क झाल्या आहेत. विकास आणि पुनर्वसन यांचे प्रशासकीय पातळीवर
पर्यावरण संतुलन आवश्यक
प्रकल्पात समाविष्ट होणाऱ्या 52 गावांमधील जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी पर्यावरणतज्ज्ञांच्या अपेक्षा व सूचनांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचे प्राधिकरण असणाऱ्या रस्ते विकास महामंडळाकडून आहे. सात अटी, शर्तींवर विकास करताना या गावांमधील पर्यावरणाचा समतोल कसे राखणार याची शास्त्रीय मांडणी होणे आवश्यक आहे.
या प्रमुख गावांचा समावेश
नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, केलवली, नावली, धावली, जावळी तालुक्यातील वेळे, वासोटा, उंबरेवाडी, सावरी, कसबे बामणोली, अंधेरी, कास, म्हावशी, माजरे, शेवांदी, फळणी, देऊर, वाघळी, मुनवले, जांब्रुख, पाटण तालुक्यातील आंबेघर, गढवखोप, नहिंबे, देवघर तर्फ हेळवाक, चिरंबे, रासाटी, कारवट, दस्तान, वांझोळे, दिवशी खुर्द, काठी, नाणेल, घणबी, सावरघर, वाटोळे, गोजेगाव, खिवशी, बाजे, भांबे, घेरादातेगड, केर या गावांचा समावेश असेल.
महाबळेश्वरची मर्यादा संपली?
महाराष्ट्रातील प्रसिद्ध दहा पर्यटनस्थळांपैकी महाबळेश्वर, पाचगणी व कास पठार ही पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीची ठिकाणे आहेत. महाबळेश्वरला दरवर्षी 18 ते 20 लाख पर्यटक येतात. मात्र, अपुरी पार्किंग व्यवस्था, अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे, बेसुमार वृक्षतोड यामुळे पर्यटकांचा ताण सोसण्याची महाबळेश्वरची क्षमता संपली आहे. पाचगणीत टेबल लॅंडवरील नैसर्गिक अन्नसाखळीला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. बेल एअर हॉस्पिटल वगळता इतर कोणतेही मोठे हॉस्पिटल नाही. जमिनीच्या किमती प्रचंड असून भूमाफियांची मोठी साखळी सक्रिय आहे. कास पुष्पपठार संयुक्त राष्ट्रांनी जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केल्यापासून अतिक्रमणे सर्रास वाढली आहेत. कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रकल्पात तीन हजार झाडांची तोड झाली आहे. तेथे नव्याने वृक्ष लागवड झालेली नाही.