सणबूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आताचे राज्याचे गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीकडून मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग पक्षवाढीसाठी करत पक्षाला बळकटी देण्याचे काम गेल्या 50 दिवसांत महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले आहे.
शंभूराज देसाई यांच्या आमदारकीच्या मागील दोन टर्ममधील कामांची, जनहितार्थ कार्याची आणि ग्रामीण भागात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पद्धत पाहून राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभूराज देसाईंना राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे.
गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या पाच खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गत 50 दिवसांत आपल्या कार्याचा करिष्माच दाखविण्यास सुरूवात केली आहे.
महिन्याभरातच आपल्याकडील खात्यांच्या आढावा बैठका घेण्याबरोबर वित्त व नियोजन विभागांच्या राज्यस्तरीय बैठकांना उपस्थिती लावली. वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रही राहून सातारा जिल्ह्याबरोबर पालकत्व असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या विकासासाठी जादाचा निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्न केले. चारही जिल्ह्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जादाचा निधी खेचून आणण्यात ते यशस्वी झाले आहेत.
गेल्या 50 दिवसांत त्यांनी सातारा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या दोनदा तर वाशिम, सांगली व कोल्हापूर येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या पक्षाच्या आढावा बैठकीस उपस्थित आजी-माजी आमदारांनी त्यांच्या मनोगतात शंभूराज देसाईंच्या राज्यमंत्री म्हणून कार्याचा उल्लेखनीय गौरव केला आहे.
ना. देसाई यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातलाच आहे. तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याच बरोबर पक्षवाढीसाठीचे काम त्यांनी गतीने हाती घेतल्याचे दिसत आहेत.