नगर -करोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील 22 हजार ग्रामसेवक योद्धयाप्रमाणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता योगदान देत आहेत. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. ही बाब लक्षात घेवून शासनाने ग्रामसेवकांना मुख्यालय सोडून इतर कोणतेही अतिरिक्त काम देवू नये, अशी एकमुखी मागणी ग्रामसेवक प्रतिनिधींनी केली. सरकारने अशा अतिरिक्त कामांची सक्ती केल्यास ते नाकारण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका राज्य ग्रामसेवक युनियनने घेतली आहे. अशी माहिती युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी दिली.
ढाकणे यांनी राज्यभरातील ग्रामसेवक प्रतिनिधींची वेबिनार घेवून संवाद साधला. या वेबिनारमध्ये राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, संजीव निकम, मिनाक्षी बनसोड, बापू आहिरे, आशिष भागवत, भिवराव दाणे, पुंडलिक पाटील, उद्धव फडतारे, दीपक दवंडे, उमर मुलानी, राजेंद्र्र पावसे, अशोक नरसाळे, सुनिल नागरे, मंगेश पुंड आदींसह राज्याच्या विविध जिल्ह्यातील 40 प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या ऑनलाईन चर्चेत विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींनी प्रश्न, अडचणी मांडून युनियनच्या माध्यमातून या प्ररश्नांची सोडवणूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तहसील कार्यालयात बोलावून घेणे अशी अतिरिक्त कामे सोपवली जात आहेत. त्याचा थेट परिणाम गावातील कामांवर होत असल्याने ग्रामसेवकांनी मुख्यालयातील सोडून इतर कामे नाकारावी, असा ठराव करण्यात आला.