मुद्रांक शुल्कच्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतला मिळावा: आमदार कुल, प्रदीप कंद यांची मागणी

वाघोली; मुद्रांक शुल्कच्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीला मिळावा अशी मागणी आमदार राहुल कुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रदीप कंद यांनी सांगितले की, पुणे जिल्हातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मुद्रांक शुल्क उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा हा पुणे जिल्हा परिषद व ५० टक्के हिस्सा हा संबधित ग्रामपंचायतीला देण्याची तरतूद होती. पुणे महानगर क्षेत्राच्या विकाससाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर त्यांना कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने ५० टक्के हिस्सा हा पुणे जिल्हा परिषद, २५ टक्के हिस्सा हा संबधित ग्रामपंचायत व २५ टक्के हिस्सा पीएमआरडीए अशी तरतूद करण्यात आली होती. ॉ
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती पाहता व पीएमआरडीएकडे वाढलेले उत्पन्नाचा स्त्रोत पाहता, या २५ टक्के हिस्स्याची आवश्यकता पीएमआरडीएला नसल्याने सदर तरतूद रद्द करून पुणे जिल्हातील मुद्रांक शुल्कच्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतला मिळण्याची आवश्यकता आहे.
तरी पुणे जिल्हातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मुद्रांक शुल्कच्या उत्पन्नातील ५० टक्के हिस्सा पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतीला मिळण्याबाबत आपणाकडून संबधितांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी आमदार अॅड. राहुल सुभाष कुल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून जवळपास ८०० ग्रामपंचायतीला याचा लाभ होणार आहे.
प्रदीप कंद (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे)





