91 गावकारभाऱ्यांसाठी उडणार “धुरळा’ : मोर्चेबांधणीला वेग
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणुका जरी उशीरा असल्या तरी आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू झाली आहे. तर युती शासनाचा थेट सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने मागे घेतला असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तर ग्रामपंचायत निवडणुकीत आपली सरशी व्हावी, यासाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बांशिग बांधून तयार असून त्यांनी आतापासूनच वरिष्ठाकडे “फिल्डिंग’ लावण्यास प्रारंभ केला आहे. तर सरपंचपदाची आरक्षण सोडत फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निघण्याची शक्यता असून त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीत खेड मतदारसंघात परिवर्तनाची लाट आली. त्यातच सत्तांतर नाट्य संपुष्टात आल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्यामुळे अनेक वर्षे एकमेंकाविरोधात लढणारी शिवसेना आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचा घटक बनली आहे. त्याचा गाव पातळीवर फारसा परिणाम होणार नसला, तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांनी अडचण होण्याची शक्यता होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचयतींचा जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार आहे. त्यासाठी त्यासाठी निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभागरचना, आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. परिणामी गावांमधील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. तालुक्यात राष्ट्रवादी, शिवसेनेत नेहमी चुरस पाहायला मिळते. मात्र, यावेळी कोणती भूमिका स्थानिक नेते घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अवघ्या सहा ते आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक प्रश्नांची फक्त चर्चा दिसण्याची शक्यता आहे. त्यातच पाच वर्षांत रखडलेले स्थानिक प्रश्न, विकासकामे, गटातटाचे राजकारण, विकासनिधीचे वाटप अशा विविध कारणांमुळे स्थानिक राजकारण उफाळून येणार आहेत. प्रत्येक गावांत दोन ते तीन गट सक्रिय आहेत. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप अशा विविध पक्षांची विचारधारा असलेले गट गाव पातळीवर आहेत.
त्यामुळे काही नेते सोयीचे राजकारण म्हणून प्रस्थापित, विरोधकांच्या वळचणीला जातात. त्यातून चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी सर्वच पक्षांच्या हाती असल्यामुळे आपण कोणत्या प्रभागात कमी पडलो आहोत, यावरून सर्व पक्षांकडून डागडुजीला वेग आला आहे.
महाविकास आघाडीच की…
राज्यात सत्ता परिवर्तनामुळे महाविकास आघाडीचे म्हणजेच तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघडी म्हणजेच शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आपले स्वतंत्र पॅनल उभे करणार की एकत्र लढणार हे पाहणे औत्स्युक्याचे आहे. कारण तालुक्यात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील “प्रेम’सर्वश्रुत असल्याने हे दोन्ही पक्षांच्या निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. तर भाजप स्वबळावर कोणत्या ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून तालुक्यात भाजपची शक्ती दाखवून देणार का? हे पाहणेही औत्स्युक्याचे आहे.