नवी दिल्ली – 18 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी सरकारने 17 जुलै रोजी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय पीएम मोदीही या बैठकीला उपस्थित राहू शकतात. तसेच, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक उद्या म्हणजेच 13 जुलै रोजी होणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 18 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे सुरू राहणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार हे सत्र 18 जुलैपासून सुरू होणार असून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्याचवेळी अध्यक्षपदासाठी 18 जुलै रोजी निवडणूक होत आहे.
यावेळी पावसाळी अधिवेशनात सरकार अनेक विधेयके मांडू शकते. त्याचबरोबर महागाई, ईडी, बेरोजगारी याशिवाय अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला घेरू शकतात. महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाचा मुद्दाही सरकारसाठी अडचणीचा ठरू शकतो.