सांगली – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल कोश्यारी – राज ठाकरे भेटीवरून मुख्यमंत्री ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची वीजबिलांसंदर्भात भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी, राज्यपालांनी आपल्याला शरद पवार यांची भेट घेण्याचं सुचवलं अशी माहिती दिली. आता राज ठाकरेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी, ‘सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे?’ असा टोला लगावला.
चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे?
”राज्यपाल काय म्हणाले ते मला माहिती नाही. ते कोणत्या हेतूनं म्हटले तेही माहिती नाही. पण मला विचाराल, तर आता सध्या शरद पवारच राज्य चालवत आहेत. उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे? एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर शरद पवारांना भेटावं लागेल. कारण उद्धवजी ना प्रवास करतात. ना व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे लोकांचं म्हणणं ऐकतात.”
मंदिर प्रश्नावरूनही सुनावलं
“आता मंदिराचं. महाराष्ट्रातील २५ मोठ्या मंदिरांची व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे मीटिंग घ्या. सहा सहा महिने मंदिर बंद असल्यानं भक्त जी दक्षिणा टाकतात, ती बंद आहे. कर्मचाऱ्याचे पगार सुरू आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. अनेक मंदिर खूप सामाजिक कामं करतात. त्यांची गंगाजळी संपत चाललेली आहे. हे समजून घ्यायला पण त्यांना वेळ नाही.”
देवेंद्र फडणवीस, शरद पवार सहज उपलब्ध
“मग लोकांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे लोक असं म्हणतात की, त्यांना भेटून घ्या. गेल्या आठ नऊ महिन्यात माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून उत्तर आलेलं नाही. त्यामुळे जर अशी भावना निर्माण झाली. राज्यपालांनी काय म्हटलं मला माहिती नाही. पण, ही वस्तुस्थिती आहे. उद्धवजींनी मी इथे बसतो, चालवण्याचं कंत्राट तुम्ही घ्या, असं केलेलं दिसतं,”