अमृत महामंडळाद्वारे संधी मिळणार ः मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांकडे विषय मांडणार
कोथरूड, दि. 20 (प्रतिनिधी) – ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळात समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अमृत महामंडळाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध होतील, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शनिवारी कोथरूड येथे पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. त्यामध्ये प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील मागण्यांसह अमृत महामंडळाचाही समावेश होता. यावेळी महासंघाचे आनंद दवे, मनोज तारे, राहुल आवटी, मयुरेश आरगडे, मदन सिन्नरकर, तृप्ती तारे, सुशील नगरकर, मिलिंद बर्वे, राजेश कुलकर्णी, भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रत्येक घटक सुखी समाधानी राहिला पाहिजे, असा प्रयत्न झाला. त्यासाठी जो घटक आरक्षणाच्या कक्षेत येत नाही, त्यांच्या विकासासाठी नवीन महामंडळाचा प्रस्ताव समोर आला. त्यानुसार अमृत नावाने एक महामंडळ तयार झाले. पण सरकार गेल्याने, सदर महामंडळाचे कामकाज बारगळले. आता अडीच वर्षांनंतर पुन्हा राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले असून, हे सरकार समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. अधिवेशनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन, समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू.’