बारामती/ डोर्लेवाडी – राज्यात बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. पण काही लोक शर्यतीवरून स्टंट करीत आहे. स्टंट करणाऱ्यांचे केंद्रात सरकार आहे. त्यांना कोण अडविले होते, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला. यावेळी पवार यांनी शर्यतीवरून विरोधकांना कानपिचक्या दिल्या.
पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शर्यतीला परवानगी देता येत नाही. सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला महत्व आहे. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेला प्रश्न आहे. संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला आहे.
सध्या काहीजण स्टंटबाजी करीत आहेत. जे स्टंट करतात त्यांचे मागील पाच वर्षांत सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं. आताही केंद्रात त्यांचेच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आम्ही लोकांचं भलं करतोय, असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.
वास्तविक कोणत्याही पक्षाची किंवा पक्षविरहीत व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रकारे कोणतेही कृत्य चालणार नाही. लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी त्याचे पालन केले आहे. कारण ते सर्वांच्या हिताचं होते. मात्र आम्हीच नियम करायचे आणि आम्हीच स्पर्धा घेऊन नियम मोडायचे, हे आमच्या रक्तात नाही, असा टोला पवार यांनी विरोधकांना लगावला.
फोटो-