Gondia News : ‘जन्मोजन्मीची सोबत’ आणि ‘मरणापर्यंतची साथ’ या केवळ शब्दांतील आणाभाका नसून त्या जगण्यातील वास्तव असू शकतात, याची प्रचिती गोंदिया जिल्ह्यात आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोला येथील एका वृद्ध दांपत्याने अवघ्या २४ तासांच्या अंतराने जगाचा निरोप घेतला. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पत्नीनेही प्राण सोडले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुखात अन दुःखात ५० वर्षांची सोबत – गिरोला येथील सोविंदा गणपत बोरकर (८०) आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई बोरकर (६५) यांनी संसाराची ५० हून अधिक वर्षे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून व्यतीत केली. गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी सुखाचा संसार उभा केला होता. उतारवयात दोघेही एकमेकांसाठी सर्वात मोठा आधार होते. काळाचा घाला अन् विरहाचे दुःख – १२ फेब्रुवारी रोजी सोविंदा बोरकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. अर्ध्या आयुष्याची सोबत सुटल्याने अंजनाबाईंना मोठा मानसिक धक्का बसला. त्या मनोमन पूर्णपणे कोसळल्या होत्या. पतीचा विरह त्यांच्यासाठी असह्य ठरला. अंत्यसंस्कारापूर्वीच पत्नीचीही प्राणज्योत मालवली – दुसऱ्या दिवशी, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सोविंदा बोरकर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी घरी सुरू होती. नातेवाईक आणि ग्रामस्थ जमलेले असतानाच, अचानक अंजनाबाईंची प्रकृती खालावली. पतीच्या पार्थिवाकडे पाहत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकाच घरातून पती-पत्नीची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाल्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. एकत्रच झाले अंत्यसंस्कार – आयुष्यभर सोबत राहिलेल्या या जोडीवर गिरोला येथील स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे “खऱ्या प्रेमाची आणि निष्ठेची ही एक दुर्मिळ पण करुण कहाणी” असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.