Gold Silver Prices : जागतिक बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढल्याने मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंनी ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या भावाने प्रथमच १.५ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून चांदीने ३.२७ लाख प्रति किलोचा टप्पा गाठून सर्वांनाच चकीत केले आहे. सोन्याचा विक्रमी वाढ फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ६,८६१ रुपयांच्या (४.७%) वाढीसह १,५२,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस ४,७०० डॉलरच्या पार गेल्याने आणि रुपयाची सातत्याने होणारी घसरण यामुळे २०२६ च्या सुरुवातीपासूनच सोन्यात ही तेजी पाहायला मिळत आहे. चांदीही सुसाट- चांदीच्या दरातही अभूतपूर्व वाढ नोंदवण्यात आली. मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव तब्बल १७,७२३ रुपयांनी (६%) वधारून ३,२७,९९८ रुपये प्रति किलो या ‘ऑल टाइम हाय’वर पोहोचला. विशेष म्हणजे गेल्या अवघ्या दोन सत्रांत चांदीच्या दरात ३२,००० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. स्थानिक इंदूर बाजारपेठेतही चांदी ३,१२,५०० रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. दरवाढीची प्रमुख कारणे: जागतिक तणाव: अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील संभाव्य ‘ट्रेड वॉर’. सुरक्षित गुंतवणूक: आर्थिक अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराऐवजी सोन्याला दिलेली पसंती. डॉलरची मजबूती: आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याचा परिणाम. गुंतवणूकदारांनी काय करावे? बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरता येत नाही, तोपर्यंत ही अस्थिरता कायम राहील. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसमोर मोठे प्रश्नचिन्ह आहे. १. नफा वसुली (Profit Booking): ज्यांनी कमी दरात सोने खरेदी केले आहे, त्यांच्यासाठी ही नफा कमावण्याची चांगली संधी आहे. २. नवी खरेदी: लग्नसराईसाठी खरेदी करणाऱ्यांना आता वाढीव किमतीचा फटका बसणार आहे. सध्याच्या दरात मोठी गुंतवणूक करण्याऐवजी थोडी प्रतीक्षा करणे योग्य ठरू शकते. ३. प्रतीक्षा करा: बाजार सध्या अत्यंत अस्थिर असल्याने घाईघाईत कोणताही निर्णय न घेता बाजाराच्या स्थिरतेची वाट पाहणे हिताचे ठरेल. सराफा व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात तेजीचे वातावरण असले तरी चढ-उतार कायम राहतील. त्यामुळे सामान्यांनी आणि गुंतवणूकदारांनी अत्यंत सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे.