सातारा -जिल्हा परिषदेच्या विविध बैठकांना अनेक अधिकारी वारंवार अनुपस्थित असतात, ही बाब गंभीर असून वारंवार बैठकांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा काढा, अशी सूचना सदस्यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत केली.
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा बुधवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभावती सौ. सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती सौ. कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी सुनील शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जिल्ह्यात 25 गावे आणि 40 वाड्या वस्त्यांवर टॅंकरने पाणी पुरवठा होत असल्याचे अभियंता सुनील शिंदे यांनी सांगितले. किरण सायमोते यांनी पाणी पुरवठा व स्वछता विभागाचा आढावा सादर केला. पाणी पुरवठा आणि जल संधारणाची कामे गतीने करण्याच्या सूचना अध्यक्ष कबुले यांनी केल्या. जिल्ह्यातील दिव्यांगाना प्राधान्यक्रमाने कामे द्या. बजेटमध्ये तरतूद करून त्यांना खाद्य स्वरूपात मदत करा. एमआरजीएस मधून कृषी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येणारी वृक्ष लागवडीची कामे दिव्यांगाना द्या, अशी सूचना संतोष धोत्रे यांनी मांडली.
राज्य शासनाच्या अनेक विभागाचे अधिकारी बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याची सूचना यावेळी करण्यात आली. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून 1759 ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कच्या वाटपास यावेळी मंजुरी देण्यात आली.