आमच्या कीडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या; हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँकेकडे मागणी

हिंगोली – राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही बँका वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रावर बोट ठेवत आहेत. त्यामुळे पिककर्जाचे पुनर्गठण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकेने कर्जाचे पुनर्गठण करावे अन्यथा आमच्या किडन्या घेऊन पिककर्ज द्यावे, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली आहे.
या संदर्भात शेतकरी संगिता पतंगे, पांडुरंग मानमोठे, दशरथ मानमोठे, विनायक कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, विजय कावरखे, रामराव पतंगे, विकास सावके यांच्यासह शेतकऱ्यांनी गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
राज्यात मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरीपाचे पिक हाती आले नाही. त्यातच रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. दोन्ही हंगामात लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शासनाने राज्यातील 15 जिल्ह्यांमधून दुष्काळी परिस्थिती जाहिर केली आहे. या शिवाय मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील पैसेवारी 50 पैशाच्या आत आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीचा लाभ मिळणे गरजेचे आहे.
ज्या जिल्ह्यात पैसेवारी कमी आहे, त्याठिकाणी पिककर्जाचे पुनर्गठण करावे, शेतसारा माफ करावा, विद्यार्थ्याचे परिक्षा शुल्क माफ करावे असे, आदेश आहेत. मात्र पिककर्जाच्या पुनर्गठणाबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही. बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने केवळ शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी, अशा सुचना दिल्या आहेत. या सुचनांवरच बँका बोट ठेवत असून सन 2023च्या पुर्वीच्या पिककर्जाचे पुनर्गठण करण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडणार आहेत.
दरम्यान, बँकेकडून कर्ज नसल्यामुळे पेरणी कशी करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे तातडीने पिककर्जाचे पुनर्गठन करून कर्ज वाटप करावे, अन्यथा आमच्या किडन्या घेऊन कर्ज द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.





