नवी दिल्ली – ज्यावेळी काश्मीरात काळा बर्फ पडायला सुरुवात होईल त्यावेळी मी भाजपमध्ये प्रवेश करेन अशा शब्दांत राज्यसभेची नुकतीच मुदत संपलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
गुलाम नबी आझादांची चाळीस वर्षाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्याबद्दल एक आठवण सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत भावूक झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी गुलाम नबी आझादांची स्तुती करुन त्यांना सलाम केला होता. त्यानंतर गुलाम नबी आझाद लवकरच आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरु झाली होती.
गुलाम नबी आझादांनी आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीपैकी 28 वर्षे राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. चार पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही राहीले. त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणूनही काम केले आहे. संसदीय कार्यमंत्री या महत्वाच्या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
आझाद म्हणाले की, “ज्यावेळी काश्मीर मध्ये काळा बर्फ पडेल त्यावेळी मी भाजप किंवा इतर पक्षात प्रवेश करेन. जे लोक या प्रकारची अफवा पसरवतात त्यांना माझ्याविषयी काही माहित नसल्याचे दिसते आहे. जेव्हा राजमाता सिंधिया विरोधी पक्षाच्या उपनेत्या होत्या त्यांनी माझ्यावर काही आरोप ठेवले होते. त्यावेळी मी अशी मागणी केली की अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि राजमाता सिंधिया यांची एक समिती तयार करावी आणि त्यांनी माझ्यावरील आरोपांची शहानिशा करावी. ते जो निर्णय देतील तो मला मान्य असेल. त्यावर वाजपेयी म्हणाले होते की मी गुलाम नबी आझादांना चांगले ओळखतो, राजमाता सिंधिया त्यांना ओळखत नाहीत.”
दरम्यान, गुलाम नबी यांनी ते भाजपात जाणार नाहीत हे स्पष्ट केले असले तरी दिल्लीच्या वर्तुळात आणि माध्यमांमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. भाजपमध्ये त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल, त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार बनवण्यात येईल किंवा एखाद्या महत्वपूर्ण राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात येईल अशी चर्चा आहे.