प्रभात वृत्तसेवा सोरतापवाडी – उरुळी कांचन-सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवारीसाठी रस्सीखेच चांगलीच चुरशीची बनली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या दोन्ही गटांत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडे तब्बल नऊ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. या गटावर अनुसूचित जाती (पुरुष) प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून तयारी करणार्या अनेक इच्छुकांच्या मनसुबे धुळीस मिळाले. मात्र, आरक्षण एससी-पुरुष झाल्यामुळे आता नव्या उमेदवारांचा उत्साह वाढला असून खरी लढत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये होणार, अशी चर्चा राजकीय पटलावर रंगू लागली आहे. उरुळी कांचन-सोरतापवाडी गटासाठी अजित पवार गटाकडे तिकीट मागणार्यांमध्ये माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर बडेकर, पतसंस्थेचे संचालक जीवन शिंदे हे तिघे आघाडीवर असल्याचे चित्र आहे.माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी आपल्या कार्यकाळात गावात उल्लेखनीय विकासकामे केली असून त्यांना मजबूत लोकसंपर्काचा आधार आहे.तर विद्यमान सदस्य शंकर बडेकर हे पायाभूत तक्रारी, अर्ज, शासकीय कामे यात सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिल्याने त्यांची दावेदारी बळकट मानली जाते. जीवन शिंदे हे शिक्षक असल्याने सामाजिक संपर्काचे विस्तृत जाळे त्यांच्याकडे आहे. या तिघांपैकी कोणाची निवड होणार? याकडे संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागले असून, वरिष्ठ स्तरावरील हालचाली वेगाने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते अनिल कदम, योगेश सातपुते, महादेव कांबळे, गणेश कांबळे यांच्यासह इतर काही इच्छुक पदरी संधी मिळाल्यास निवडणूक लढण्याच्या मनोवृत्तीने मैदानात उतरल्याचे दिसत आहे. इतर पक्षांतही उत्सुकांची रेलचेल या गटावर राष्ट्रवादीचे दोन्ही गट, भाजप, काँग्रेस, शिवसेना, रयत शेतकरी संघटना, आरपीआय, बहुजन वंचित आघाडी आदी पक्षांकडूनही इच्छुकांची गर्दी वाढत आहे. दिवाळीपूर्वीच अनेकांनी जनसंपर्क वाढवून यंत्रणा उभी केली असून, उरुळी कांचन आणि सोरतापवाडी ही दोन्ही गावे परंपरेप्रमाणे विजयी उमेदवार ठरवण्यात निर्णायक भूमिका निभावतात. स्थानिक नेतृत्वाची भूमिका ठरवणार समीकरणे या गटातील मतदार स्थानिक नेतृत्वाला साथ देतात. त्यामुळे स्थानिक कोणाला सांगते? हा प्रश्न उमेदवारांच्या भवितव्याचा केंद्रबिंदू ठरणार आहे. स्थानिक नेतृत्वाची पसंती मिळेल तोच उमेदवार विजयी होईल, अशी भूमिका या गटात नेहमीच दिसून आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) तर्फे तिकीट कोणाला मिळणार? हे स्पष्ट होताच संपूर्ण हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. सध्या गटातील परिस्थिती पाहता, ही निवडणूक अधिक रंगतदार, अधिक चुरशीची आणि अनेक समीकरणे बदलणारी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.