पुणे – ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या आविष्कार असलेल्या “गीतरामायण’चे स्वामित्व हक्क (कॉपीराइट) अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडे आहेत. त्यामुळे “गीतरामायण’ कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या संस्था आणि कलाकारांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीमध्ये, तसेच कार्यक्रम सादर होत असलेल्या व्यासपीठावरील फलकावर “ग. दि. माडगूळकर विरचित गीतरामायण’ असा उल्लेख ठळकपणाने करायला हवा, अशी अपेक्षा
गदिमा कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गीतरामायण हे महाकवी ग. दि.माडगूळकर यांनी रचलेले दीर्घ काव्य आहे. भारतात आणि परदेशात मराठी गीतरामायणाचे कार्यक्रम होत असतात. गीतरामायणाचे रूपांतरित हिंदी, गुजराती, कन्नड, तमिळ अशा विविध भाषांत कार्यक्रम होत असतात. मात्र, गदिमा-बाबूजी नावाचा उल्लेख न करण्याचा प्रकार दिसून येत आहे. कार्यक्रमाच्या जाहिरातीत, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या फलकावर लेखक म्हणून गदिमांचा उल्लेख केला जात नाही. गीतरामायण सादर होणाऱ्या प्रत्येक जाहिरात फलकावर तसेच कार्यक्रमाच्या फलकावरही “महाकवी ग.दि.माडगूळकर विरचित गीतरामायण’ असा उल्लेख असायलाच हवा. तसेच, संगीत सुधीर फडके असा उल्लेख असणे आवश्यक आहे, अशी मागणी गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.
गीतरामायणाचे स्वामित्व हक्क अजूनही माडगूळकर आणि फडके कुटुंबीयांकडेच असून ते सन 2062 पर्यंत अबाधित राहणार आहेत. गदिमांना त्यांचे श्रेय योग्य रीतीने न दिल्यास माडगूळकर कुटुंबीयांतर्फे संबंधित कार्यक्रमावर स्वामित्व हक्क कायद्यामार्फत आक्षेप घेतला जाईल, असे माडगूळकर यांनी सांगितले.
“गीतरामायण’ कार्यक्रम करण्यावर आमचा आक्षेप नाही. गीतरामायण नव्या पिढीचे कलाकार पुढच्या पिढीपर्यंत नेत आहेत, याचा आनंदच आहे, मात्र, गदिमांच्या नावाचा उल्लेख जाहिरातीत आणि कार्यक्रमात असावा. गदिमा आणि सुधीर फडके यांना त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे.
– सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू