मुंबई: निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून नुकसानग्रस्तांना आणखी वाढीव मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यातील अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री बोलत होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सीगला उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार इतर महत्वाचे नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र व कोकणच्या विकासासाठी जे जे करता येईल ते सर्व केले जाईल. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई नुकसानग्रस्तांना तात्काळ देण्याचे काम सुरु झाले आहे. या कालावधीत प्रशासनानेही चांगले काम केले आहे. खऱ्या नुकसानग्रस्तांना तात्काळ व योग्य ती मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम चालू ठेवावे. नुकसानग्रस्तांना वाढीव मदतीचा शासन निर्णय आजच निर्गमित करुन वाटप तात्काळ सुरु करण्यात येईल.
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी शासनाने दिलेली मदत ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संकट कितीही गंभीर असले तरी सरकार जनतेसोबतच आहे. कोकणातील फळबागांचे चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या फळबागा वाचवण्यासाठी निश्चित असे धोरण लवकरच आखण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे-
उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजपर्यंत कोकणवासियांना कमी मदत मिळत गेलेली आहे. परंतु आता निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नुकसानग्रस्तांना आणखी वाढीव निधी आजच वितरित करण्यात येईल. हा निधी योग्य त्या नुकसानग्रस्तांना मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले.