विशाल भालेराव
खडकवासला : पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावरील किल्ले सिंहगड पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी रस्यावर करावा लागत आहे. वनविभागाच्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतदेहाची मृत्यूनंतरही ससेहोलपट होत आहे.
किल्ले सिंहगड पायथ्याला असलेली आतकरवाडी घेरा सिंहगड ग्रामपंचायतीतील ८ वाड्यांपैकी हजार लोकसंख्येची वाडी आहे. वाडीत आदिवासी नागरिकांची संख्या मोठी आहे. वाडीचा परिसर शासनाच्या वनविभाग हद्दीने वेढलेला असल्यामुळे गावाला इतर मोकळी जागा नाही. वाढीची हद्द संपली, की लगेच सिंहगड सुरू होतो. तर, अनेक गावकऱ्यांनी आपल्या जागा बाहेरील लोकांना विकल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक जागा शिल्लक नसल्यामुळे गावाला स्मशानभूमीसाठी जागाच नाही. यामुळे रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर अंत्यविधी करताना खुपदा पाण्याच्या लोंढ्यात अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेल्याचे नागरिक दु:खद अंतकरणाने सांगतात. पावसाळ्यात अंत्यविधी करताना सरणावर छोटासा मंडप करून पत्राही टाकण्यात येतो. परंतु, तो केवळ तेवढाच वेळे काळापुरता असतो. त्यानंतर पुन्हा रस्त्यावरच सरण रचले जाते. प्रशासनाने हक्काची स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी आणि मृत्युनंतर होणारी विटंबना थांबवावी, अशी जनभावना आहे.
ओढ्यात आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर येते. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना अनेकदा मृतदेह अर्धवट जळतात. अशावेळी गावकऱ्यांची मोठी धांदल उडते. गेल्यावर्षी अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांपर्यंत पाणी पोहचले, त्यामुळे निम्मे अर्धे जळालेले मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना गावकऱ्यांना मोठा त्रास झाला. पावसाळ्यात तर अडचणी येतात.
– मोनिका पढेर, सरपंच, घेरा सिंहगड
घेरा सिंहगडच्या ग्रामपंचायतीने आतकरवाडीच्या स्मशानभूमीसाठी आवश्यक असलेल्या जागेचा प्रस्ताव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून वनविभागास पाठविल्यास आम्ही त्वरित निर्णय घेऊन जागा उपलब्ध करून देऊ.
– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे
आतकरवाडी स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यास स्मशान भूमीच्या बांधकामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून बांधकाम करण्यात येईल.
-भिमराव तापकीर, आमदार, खडकवासला विधानसभा मतदार संघ