पुणे : आतापर्यंत उत्तर प्रदेश-बिहारमध्ये पाहायला मिळणारे चित्र आता शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातही दिसून आलं आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने थेट तुरुंगातून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत लोकशाहीचाच बाजार मांडला. तोंडावर काळं कापड, पोलिसांच्या दोरखंडात जखडलेला आणि कडक बंदोबस्तात आणलेला बंडू आंदेकर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अर्ज भरताना व्हिक्ट्री साईन दाखवत शक्तीप्रदर्शन करताना दिसून आला. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ अशा घोषणांसह त्याने अर्ज भरण्याची एन्ट्री घेतली आणि अर्ज दाखल करतानाच स्वतःच्या प्रचाराचा नारळ फोडला. शनिवारी पोलिस बंदोबस्तात भवानी पेठ कार्यालयात आणण्यात आलेल्या आंदेकरने, बघा बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. आंदेकरांना मत म्हणजे विकासकामांना मत. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. वनराज आंदेकर जिंदाबाद, अशा घोषणा देत वातावरण तापवलं. सध्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला बंडू आंदेकर पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहे. आंदेकर कुटुंबातील तिघेही निवडणूक रिंगणात महापालिका निवडणुकीसाठी आंदेकर कुटुंबातील तिघांना विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांना परवानगी दिली गेली आहे. मात्र न्यायालयाने बंडू आंदेकरला मिरवणूक, भाषण आणि घोषणाबाजी करण्यास स्पष्ट मनाई केली होती. तरीही प्रत्यक्षात घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीही ५ कोटी ४० लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात सध्या कारागृहात आहेत. आंदेकर कुटुंबातील हे तिघेही प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त बंडू आंदेकरला खंडणीच्या गुन्ह्यात कारागृहातून गुन्हेशाखेने पोलीस कोठडीत घेतले आहे. तो सध्या गुन्हे शाखा युनिट एकच्या ताब्यात आहे. तर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर या कोल्हापूर कारागृहात आहेत. त्यांना तेथून सकाळी साडे नऊला पुणे शहरात आणण्यात आले. तीघांनाही साडे अकराच्या सुमारास क्षेत्रीय कार्यालयात आणण्यात आले. ते दुपारी तीन वाजता बाहेर पडले. तो पर्यंत परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली होती. परिसरात बॅरिकेटस लावून सर्वसामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली होती. यामुळे आंदेकर टोळीचे नंबरकारी तीकडे फिरकलेच नाहीत.