- बस थांबा झाला चायनीज कॉर्नर; प्रशासकीय कारवाई मात्र केवळ कागदोपत्री
कर्जत : कर्जत चारफाटा येथे दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम खुलेआम उभारत असल्याचे दिसून येत आहेत. केवळ नोटीस पाठविण्याचे काम करीत आहे; मात्र कारवाईकडे कानाडोळा करीत असल्याचे अखेर एका पांडू चायनीज कॉर्नर धारकांनी चक्क बस थांब्यावर चायनीज नावाचा फलक लावला आहे. या संदर्भात पत्रव्यवहार करूनही कारवाई केली जात नाही. नक्की यामागे काय गौडबंगाल आहे, याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
कर्जत चारफाटा हा शहराला जोडलेले केंद्र स्थान आहे. या केंद्र स्थानावर कृषी विद्यापीठ आहे. त्याठिकाणी अनधिकृत हातगाड्या, हॉटेल, बियर शॉप, रिक्षा स्टॅण्ड, चायनीज कॉर्नर, आईस क्रीम पार्लर, असे अनधिकृत बांधकाम अगदी रातोरात उभारले जात आहे. आणि याबाबत तक्रार करून ही फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित व्यक्तीला आणि ग्रामपंचायतीला नोटीस देऊन कळविले जाते. पण कारवाई केली जात नाही. ते बांधकाम होऊपर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेतली जाते.
तसेच कर्जतमध्ये पर्यटन आणि विश्रांतीसाठी अनेक दिग्ग्ज नेते, कलावंत, धनदांडगे ये-जा असते. कर्जतमध्ये येत असताना “क्षणभर विश्रांती’साठी वाहने या हॉटेलच्या बाहेर कसेही कुठेही उभी केली जातात. आणि ट्राफिक जाम होते. मुळात रस्ता अरुंद आहे. ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. एखादा रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास तर त्या रुग्णवाहिकेला रस्ता काढून देण्यासाठी पोलिसांची सिटी वाजून तोंडाला फेस येण्याची वेळ येते.
यामध्ये अनेकजण राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनीच जागेवर कब्जा केला आहे. नक्की राजकीय पक्षाचा वापर यासाठी केला जातो, का असा प्रश्न प्रवासीधारकांना पडत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यापेक्षा अनेक नेतेंचे फार्महाऊस याच मतदार संघात आहे. कर्जतमध्ये विविध कामांसाठी, मेळावे किंवा आढावा घेण्यासाठी येत असतात, त्यांना चारफाटा वरील अतिक्रमण केलेले बांधकाम का दिसून येत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागावर नक्की कोण दबाव टाकत आहे. अतिक्रमण हटवू शकत नाही. मुख्यतः जो कोणी पांडू चायनीज कॉर्नर धारक त्याची एवढी हिंमत कुठून आली की शासकीय बस थांब्यावर चायनीज फलक लावला. तरीही कारवाई केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासकीय बस स्थानकावर जो कोणी पांडू आहे, त्यांनी ज्याप्रमाणे चायनीज फलक लावले, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. स्वतःच्या हॉटेलची प्रसिद्धी करण्यासाठी खासगी फलक लावण्याचा अधिकार कोणी दिला आहे. आणि लवकर ते फलक हटविले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विरोधात कोर्टात केस दाखल करण्यात येईल. या अतिक्रमणामुळे ये-जा करताना खूप त्रास होते. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाते.
– सतीश जाधव, निर्धार संघटना