श्रीनगर – काश्मीरात पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी आज ठार झाले. ही माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली. या चकमकीत तीन लष्करी जवान आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. या चौघांची प्रकृती आता स्थीर आहे असे त्यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी ही चकमक झाली त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि युद्धजन्य परिस्थीत वापरण्या सारखा विविध वस्तुंचा साठा केलेला आढळून आला आहे. जिल्ह्याच्या लसीपोरा भागात ही चकमक झाली. तेथे अतिरेक्यांचे वास्तव्य असल्याची पक्की खबर सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर त्या भागाची नाकेबंदी करून ही तपासणी करण्यात आली त्यावेळी ही चकमक झाली.
ठार झालेल्या अतिरेक्यांची अजून ओळख पटलेली नाही. तेथे हे चारच अतिरेकी होते की त्यांचे बाकीचे साथीदार पळून गेले याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.