क्रीडाविश्वात शोककळा, मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन; वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Milind Rege passed away | मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने क्रिडाविश्वात शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.
मिलिंद रेगे यांनी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली आहे. ते मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधार होते. याशिवाय, संघाचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी भूमिका पार पाडली होती. ते निवड समितीचे सदस्यही होते. त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही भूमिका बजावली होती.
16 फेब्रुवारी 1949 ला जन्म झालेल्या मिलिंद रेगे यांनी मुंबईकडून 967/68 ते 1977/78 या काळात प्रथम श्रेणी सामने खेळले होते. वानखेडे स्टेडियमवर खेळलेल्या गेलेल्या पहिल्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यातील मुंबई क्रिकेट संघाचाही ते भाग होते.
ऑल-राउंडर असलेल्या मिलिंद रेगे यांना वयाच्या 26व्या वर्षीही हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु, असे असतानाही ते क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा परतले. त्यांनी रणजी ट्रॉफीत मुंबईचे नेतृत्व केले होते. त्यांनी प्रथम श्रेणीचे एकूण 52 सामने खेळले. यात 126 विकेट्स आणि 23.56 च्या सरासरीने 1,532 धावा केल्या. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे त्यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. 2011 मध्ये त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. मात्र, 2012 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी रेगे यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. मिलिंद रेगे सरांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. मुंबई क्रिकेटचे एक प्रमुख स्तंभ, खेळाडू, निवडकर्ते आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे योगदान अनमोल होते. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक क्रिकेटपटूंना घडवले, असे त्यांनी म्हटले आहे.





