बीड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात तब्बल २० वर्षे दबदबा गाजवलेले माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) धडक प्रवेश करण्याचा निर्धार केला आहे. येत्या मंगळवारी, ११ नोव्हेंबर रोजी मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत धोंडे शेकडो कार्यकर्त्यांसह ‘घड्याळ’ चिन्ह स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वारे पूर्णपणे फिरले असून, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासमोर आता धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांची जोडी थेट आव्हान देणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, धोंडे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. प्रवेशापूर्वीच धोंडे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाची स्तुती करत म्हटलं, “दादांचं नेतृत्व विकासशील आणि खंबीर आहे. ते दिलेला वादा पक्का पाळतात. भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल, असा विश्वास आहे.” धोंडे यांच्या या उडीमुळे आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद प्रचंड वाढणार असून, महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. सुरेश धसांना मोठं आव्हान धोंडे यांच्या प्रवेशामुळे आमदार सुरेश धस यांच्यासमोर आता तिहेरी संकट उभं राहिलं आहे. धोंडे आणि बाळासाहेब आजबे हे एकत्र येऊन धसांना निवडणुकीत शह देणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धोंडे यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली होती, आता राष्ट्रवादीच्या बॅनरखाली ते अधिक ताकदीने उतरतील. बीड जिल्ह्यात अजित पवार गटाला हा मोठा बूस्ट मानला जातोय. धोंडे यांच्या भविष्य योजनांचा पाढा राष्ट्रवादी प्रवेशानंतर धोंडे यांनी आपल्या महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. ते म्हणाले, “महेश सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू करणार. कर्करोगावर मोफत उपचार देणारं रुग्णालय उभारणार. आष्टी मतदारसंघातील हजारो युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. विकासाच्या या कामांसाठी अजितदादांच्या नेतृत्वाखालील पक्षात येत आहे.” धोंडे यांचा हा प्रवास अपक्ष ते काँग्रेस, राष्ट्रवादी (जुना), भाजप आणि आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी असा चक्राकार फिरला आहे, तरीही स्थानिक पातळीवर त्यांची पकड अभेद्य आहे.