पुसेगाव – थोर समाजसुधारक आणि महापुरुषांच्या विचारांचा समाजाला व काही राजकर्त्यांना विसर पडू लागला आहे. छ. शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांनी जगाला विचारांची देणगी दिली. मात्र या विचारांचे अंगीकरण करण्याऐवजी फक्त राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा पुढे ठेवून काहीजणांच्या कडून चाललेलं राजकारण अत्यंत घाणेरडे व खेदजनक आहे. महत्मा फुलेंच्या समानतेच्या विचारांची स्मृती जपणं आणि अंगीकारण हीच खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केली. महात्मा फुले यांची कुलभूमी कटगुण (ता. खटाव) येथे त्यांच्या पुण्यतिथी समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, मुख्य लेखावित्त अधिकारी विकास सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, अंकुश गोरे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, सर्वोदय सामाजिक संस्थेचे संस्थापक जीवन इंगळे, राहुल पाटील, सरपंच जयदीप गायकवाड,माजी उपसरपंच उदय कदम, महात्मा फुले ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, गतवर्षीच्या पुण्यतिथी कार्यक्रमात शब्द दिल्याप्रमाणे आमदार फंडातून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला आरसीसी स्ट्रक्चरची आरास करण्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी दिला आहे. विधानसभेच्या कार्यकाळात महात्मा फुले स्मारकाचे सुशोभीकरण करणार आहे. तसेच दरवर्षी टेंपररी मंडपात होणारा पुण्यतिथीचा कार्यक्रम पुढील वर्षी परमनंट मंडपात होईल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदिप विधाते, माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्यक्रमात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजीत तालुकास्तरीय निबंध, रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषक देऊन गौरविण्यात आले. तसेच सत्यशोधक पुरस्काराचे वितरण याप्रसंगी करण्यात आले. माजी सरपंच सुधीर गोरे यांनी प्रास्ताविक केले. अजित चव्हाण, आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर विस्ताराधिकारी सुनिता गायकवाड यांनी आभार मानले.