लखनौ -उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्हर्च्युअल सभांचा धडाका लावणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. करोना संकट आणि बेरोजगारी विसरून भाजप निवडणुकांच्या तयारीत व्यस्त झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपच्या बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी व्हर्च्युअल सभा झाल्या. त्याचा संदर्भ देऊन अखिलेश यांनी ट्विटरवरून भाजपला लक्ष्य केले. बेरोजगारी, उपासमार यांच्याकडे भाजप समस्या म्हणून पाहत नाही. तशाने त्या समस्या कशा सुटतील, असा सवाल त्यांनी केला.
उत्तरप्रदेशात अलीकडेच इतर राज्यांमधून घरवापसी केलेल्या काही स्थलांतरित मजुरांनी आत्महत्या केल्या. त्यासाठी बेरोजगारी कारणीभूत आहे. उत्तरप्रदेशात बेरोजगारीमुळे होणाऱ्या आत्महत्या ही मोठी समस्या बनली आहे. मात्र, इतर राज्यांच्या निवडणुका जवळ आल्यावर आमच्या स्टार प्रचारकांची उड्डाणे सुरू होतील, अशा शब्दांत अखिलेश यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. याआधी अखिलेश यांनी बिहारमधील व्हर्च्युअल सभेसाठी भाजपने तब्बल 150 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप केला होता.