शिरूर तालुक्यातील शेतकरी वेठीस
शिरूर- शिरूर तालुक्यातील राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. बॅंकेत ग्राहक, शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे ग्राहक, शेतकरी ग्राहक संतापला आहे. बॅंकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मनमानी थांबविण्याची मागणी होत आहे. शिरूर शहर व तालुक्यात मोठ्या संख्येने राष्ट्रीयकृत बॅंका आहेत. शासन आपला पैसा राष्ट्रीयकृत बॅंकेत ठेवावा यासाठी ग्राहकांकडे आग्रह धरीत आहेत. त्यामुळे शेतकरी सर्वसामान्य ग्राहक राष्ट्रीयकृत बॅंकेकडे वळले आहेत. परंतु बॅंक प्रशासनात अधिकाऱ्यांचा ताळमेळ नसल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे.
सध्या सर्वच राष्ट्रीयकृत बॅंकेत बॅंक मॅनेजर ते कर्मचारी हे ग्राहकांना एखाद्या नवीन योजनेमध्ये पैसा गुंतवायला सांगतात. ग्राहक स्वतःचे पैसे बॅंकेच्या खात्यामध्ये ठेवत असतो. शासनाच्या अनेक नवनवीन योजना बॅंकेमार्फत सुरू आहेत. सर्व योजना ग्राहकांना आकर्षित करणारे आहेत. ग्राहकहिताच्याही आहेत. त्यामुळे ग्राहक त्याकडे वळलेला दिसत आहे. मात्र, नवीन खाते उघडण्यासाठी अधिकाऱ्यांना माहिती विचारल्यास कर्मचाऱ्यांचे भाव विचित्र होतात. नवीन ग्राहकांना सौजन्य दाखवित नाहीत. कर्मचाऱ्यांची वागणूक व मनमानीपणा सुरू आहे. खात्यामध्ये पैसे गुंतवलेला असेल तर तो पैसा ग्राहकाला काढायचा असेल बॅंक कर्मचारी ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत. त्यांनी बॅंकेत आपली गुंतवणूक करून मोठी चूक केली आहे. याबाबत आम्हाला काय माहिती नाही. योजना काय हे आम्हाला माहिती नाही, अशी उद्धट वागणूक हे बॅंक कर्मचारी देत आहेत.
बॅंक सेवेत येण्यापूर्वी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु त्याचाही विसर पडला आहे. या त्रासाला व राष्ट्रीयकृत बॅंकेच्या मनमानी कारभाराला सामान्य ग्राहक, शेतकरी वैतागला आहे. शिरूर तालुक्यातील काही बॅंकेतील व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी चांगले आहेत. परंतु एका अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. हे दिसून येत आहे. संबंधित प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.