महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपसोबत घरोबा केला आणि सरकार स्थापन केले. या वर्षभराच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे वाटत असतानाच हा मधुचंद्राचा काळ संपला की काय अशी शंका यावी, असा एक राजकीय गोंधळ आता समोर आला आहे. नुकतीच वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली, ज्यामध्ये एका सर्व्हेची माहिती देण्यात आली होती.
या सर्व्हेतील निष्कर्षाप्रमाणे राज्यातील जनतेने आपल्या मनातील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना प्रथम पसंती दिली होती, तर देवेंद्र फडणवीस दुसऱ्या क्रमांकावर होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व्हेतील निष्कर्ष प्रसिद्ध करण्यासाठी जी जाहिरात देण्यात आली होती त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याच छायाचित्रांचा वापर करण्यात आला होता. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस तर नव्हतेच शिवाय एकनाथ शिंदे नेहमी उल्लेख करतात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा धर्मवीर आनंद दिघे यांच्याही छायाचित्रांचा वापर या जाहिरातीत नव्हता.
जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली छायाचित्रे हा एक वेगळा विषय असला, तरी या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे जास्त लोकप्रिय आहेत हे दाखवण्याचे काम या जाहिरातीने निश्चितच केले. त्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला त्यावर उतारा म्हणून पुन्हा एकदा नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना मिळून किती जनतेने पाठिंबा दिला आहे याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सर्व नेत्यांच्या छायाचित्रांचाही वापर करण्यात आला आहे. दुसऱ्या जाहिरातीने काही लोकांचे समाधान झाले असले, तरी भाजप आणि शिवसेना यांच्यामधील वाद मात्र समोर आला आहे. या घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी लपवली नाही.
मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काहीही बोलणे त्यांनी टाळले होते. एवढेच नव्हे तर कोल्हापुरातील एका महत्त्वाच्या कार्यक्रमाकडेसुद्धा त्यांनी पाठ फिरवली होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारला आणखीन 15 दिवसांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण होईल. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. आता या विस्ताराची वेळ जवळ आली असतानाच हे गैरसमजाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेतील पाच अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू द्यावा, अशी भाजपाची भूमिका असल्यानेही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावरही भाजपने दावा सांगितल्यामुळे त्यातूनही काही वाद पुढे आला आहे.
अर्थात, मोठ्या प्रयासाने मिळवलेली ही सत्ता साध्यासुध्या कारणाने जावी असे या दोन्ही नेत्यांना वाटत नसल्याने हे गैरसमज बाजूला सारले जातील. पण या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, याचा संदेश मात्र निश्चितच या घडामोडींमुळे मिळालेला आहे. आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असा उल्लेख अनेक वेळा जरी भाजपचे नेते करीत असले तरी अशा प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या क्रमांकावर दाखवणे भाजपाच्या अनेक नेत्यांना रुचलेले नाही, हेही तेवढेच खरे. गेल्या काही महिन्यांमध्ये जनतेच्या मनातील अनेक मुख्यमंत्री पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून समोर येत आहेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काही बॅनरही नागपूर भागामध्ये महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झाली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांचासुद्धा उल्लेख अनेक वेळा भावी मुख्यमंत्री असा केला जात आहे.
विद्यमान विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचासुद्धा अनेक वेळा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला जातो. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचीसुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये जे बॅनर प्रसिद्ध झाली त्यामध्ये महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री, असा उल्लेख करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची पण काही छायाचित्रे भावी मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झाली होती. अर्थात, हे सर्व नेते विरोधी बाकावर बसत असल्याने त्यांनी अशा प्रकारे जाहिरात करणे आणि स्वतःला प्रोजेक्ट करणे समजून घेण्यासारखे आहे, पण जेव्हा सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांबाबतच जेव्हा एखाद्या सर्व्हेच्या निमित्ताने असा वाद निर्माण होतो तेव्हा तो निश्चितच लक्षणीय मानावा लागतो. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी एका सामूहिक नेतृत्वाचा आदर्श समोर आणला होता.
मंत्रिमंडळ बैठकीनंतरची पत्रकार परिषद असो किंवा एखाद्या व्यासपीठावरील कार्यक्रम असो हे दोन्ही नेते एकमेकांना योग्य आणि आदराची वागणूक देत होते. फडणवीस यांनी कधीही मुख्यमंत्री पदावर बसलेल्या एकनाथ शिंदे यांचा अवमान केला नाही आणि मुख्यमंत्री असूनही एकनाथ शिंदे यांनी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांना समान महत्त्व दिले. आता या सरकारला साधारण वर्ष होत असतानाच या दोन नेत्यांमध्ये गैरसमज निर्माण करणारा प्रसंग समोर आला आहे. अर्थात, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा देवेंद्र फडणवीस यांचा भाजप असो या दोनही नेत्यांना आणि पक्षांना एकमेकांची गरज आहे, याची जाणीव या दोन्ही नेत्यांना आहे. त्यामुळे हा वाद आणि गोंधळ संपवण्याचाच प्रयत्न दोघांकडून केला जाईल. येत्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून सर्वकाही आलबेल आहे, असे भासवण्याचाही प्रयत्न होईल.
राजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत असल्याने लवकरच जनतेच्या मनातून या गोष्टी विसरल्या जातील; पण या जाहिरातीने भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना जी जखम करायची होती ती केली आहे आणि ती जखम भरायला निश्चितच काही कालावधी लागणार आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून राज्यातील कोणत्याही पक्षाच्या नेत्याने कितीही आणि कशीही जाहिरातबाजी केली तरी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतदानाच्या दिवशी आपल्या मनातील खरी गोष्ट निवडणूक यंत्रांमध्येच मतदार प्रतिबिंबित करतात, हे विसरून चालणार नाही. साहजिकच जनतेच्या मनातील नेते कोण आहेत, हे आणखीन दीड वर्षाने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मानून जाहिरातबाजी आणि बॅनरबाजी करायला काहीच हरकत नाही.