जागतिक स्तरावर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये स्वतःचा दरारा निर्माण करणाऱ्या भारताच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने आपल्या गगनयान या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याने निश्चितच इस्रो आणि त्याचे सर्व शास्त्रज्ञ अभिनंदनास पात्र आहेत. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये चंद्रयान3 मोहीम, आदित्य मोहीम या दोन महत्त्वाच्या मोहिमा यशस्वी केल्यानंतर इस्रोने आपल्या गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले होते. येत्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये चंद्रावर पुन्हा एकदा मानवी पाऊल पडावे या हेतूने इस्रोने या गगनयान मोहिमेची आखणी केली असून त्याबाबत ज्या प्राथमिक चाचण्या केल्या जात आहेत त्यापैकी एका चाचणीला शनिवारी यश मिळाल्यामुळे आगामी कालावधीमध्ये इस्रोची ही गगनयान मोहीम यशस्वी होणार यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही.
गगनयान मोहिमेअंतर्गत अवकाशयानातून अंतराळवीर चंद्रावर पाठवले जाणार आहेत;पण ती मोहीम प्रत्यक्षात आणण्यापूर्वी ज्या विविध चाचण्या करण्यात येतात त्या चाचण्यांना आता इस्रोने सुरुवात केली असून त्यापैकी पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. शनिवारी ज्या वेळेला ही चाचणी होणार होती तेव्हा दोन तासांत दोन वेळा तांत्रिक अडथळे आल्यामुळे काही मिनिटे ही चाचणी पुढे ढकलण्यात आली होती. पण सर्व तांत्रिक अडथळ्यांवर मात करून इस्रोने चाचणी यशस्वी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या काही दिवसांपूर्वी एका व्यासपीठावरून भाषण करत असताना 2040 मध्ये इस्रोतर्फे चंद्रावर माणूस पाठवला जाईल, अशी घोषणा केली होती. त्या मोहिमेला अद्याप जरी 17 वर्षांचा कालावधी बाकी असला तरी त्याची तयारी आतापासूनच केली जात आहे. 2040 मध्ये ज्या प्रकारच्या अवकाश वाहनातून प्रत्यक्ष अंतराळवीर चंद्रावर पाठवण्यात येणार आहेत त्याच प्रकारच्या वाहनाची यशस्वी चाचणी इस्रोने शनिवारी पूर्ण केली असल्याने ही एक महत्त्वाची घडामोड मानावी लागते. अवकाशात 400 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून हे वाहन पुन्हा एकदा पृथ्वीवर यशस्वीपणे परत आल्यामुळे ही चाचणी निश्चितच यशस्वी झाली आहे.
अल्पकालावधीमध्ये इस्रोने गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे चंद्राला आणि सूर्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला आहे तो निश्चितच स्तुत्य आहे. त्यापूर्वी अमेरिकेच्या “नासा’ या आघाडीच्या अंतराळ संशोधन संस्थेने भारताच्या चंद्रयान मोहिमेचे तंत्रज्ञानही मागवले होते. साहजिकच जागतिक स्तरावर आता इस्रोच्या तंत्रज्ञानाचा दबदबा वाढू लागला आहे. अवकाश संशोधनाच्या जागतिक बाजारपेठेमध्ये आधीच इस्रोने आपला ठसा निर्माण केला आहे आणि अनेक छोट्या देशांच्या अंतराळ मोहिमा इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर या गगनभेदी मोहिमेचे यश मोजावे लागणार आहे.
एक तर इस्रोने चंद्रयान3 मोहीम यशस्वी केल्यानंतर महत्त्वाची माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध झाली आहे; पण चंद्राची संपूर्ण माहिती अद्याप माणसाला उपलब्ध नाही हे वास्तव आहे. खरे तर 1969 मध्ये अमेरिकेच्या नासाने चंद्रावर पहिल्यांदा माणूस पाठवला होता. “अपोलो 11′ या मोहिमेअंतर्गत चंद्रावर पहिल्यांदा माणसाचे पाऊल पडले होते. नासाच्या अपोलोच्या एकूण 20 मोहिमा होत्या. या 20 मोहिमांतर्गत दरवेळी माणूस चंद्रावर पाठवण्यात येणार होता; पण अपोलो 17 मोहिमेनंतर अमेरिकेने या सर्व मोहिमा थांबवल्या होत्या. 1972 मध्ये सर्वात शेवटची अपोलो 17 ही मोहीम राबवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीमध्ये अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावर माणूस पाठवण्याचा प्रयत्न केलेला नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनेसुद्धा केवळ खर्चाला घाबरून या मोहिमा रद्द केल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे इस्रोने ही सर्व तयारी केली आहे ती निश्चितच अभिनंदनीय आहे.
जागतिक पातळीवर होणाऱ्या खर्चाचा विचार करता इस्रोच्या सर्वच अवकाश संशोधन मोहिमा स्वस्त आणि कमी खर्चात होत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रयान3 असो किंवा आदित्य मोहीम असो किंवा आता होणारी गगनयान मोहीम असो या सर्व मोहिमांमध्ये इस्रोने देशी तंत्रज्ञानाचा वापर करूनच नियोजन केले आहे. म्हणूनच हे सर्व काम जास्तच अभिनंदनास पात्र आहे. 1960च्या दशकात जेव्हा चंद्रावर मानवाचे पाऊल पडण्यासाठी प्रयत्न केले होते तेव्हा त्या विषयाला शीतयुद्ध ही पार्श्वभूमी होती. रशिया आणि अमेरिका यांच्यातील राजकीय संघर्षातून वरचढपणा सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने चंद्र मोहीम आखली होती. भारताच्या अवकाश संशोधन मोहिमेला अशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा राजकीय संघर्षाचा विषयही या ठिकाणी नाही. अवकाश संशोधनाचा एकमेव विषय समोर ठेवूनच इस्रोतर्फे संपूर्ण अंतराळ मोहिमा आखण्यात येत आहेत हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आतापर्यंत इस्रोने अंतराळ संशोधनाच्या विषयांमध्ये जी कामगिरी पार पाडली आहे ती इतर सर्व देशांच्या अवकाश मोहिमांपेक्षा वेगळी आहे.
चंद्रयान मोहिमेच्या निमित्ताने चंद्राच्या उत्तर ध्रुवावर अवकाश यान पोचवण्याचा विक्रम इस्रोने केला होता. आदित्य मोहिमेच्या निमित्ताने सूर्याचे संशोधन करण्याचा अभिनव प्रयोग इस्रोने प्रत्यक्षात आणला आहे. ही मोहीमसुद्धा यशस्वी होताना दिसत आहे. आगामी कालावधीमध्ये इस्रोकडून आणखीनही काही देदीप्यमान कामगिरी अपेक्षित आहे. पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ज्या प्रकारे आर्थिक मदतीबाबत किंवा निधीच्या उपलब्धतेबाबत बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्या लक्षात घेता सरकारी पातळीवर या सर्व मोहिमांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे. अमेरिकेसारखा देश जर बजेटच्या अभावी चंद्र मोहिमा स्थगित करत असेल, तर तशा प्रकारची वेळ भारतावर येणार नाही याची काळजी सरकारला घ्यावीच लागेल. अर्थात गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये इस्रोसारख्या संस्थांना जाणीवपूर्वक आर्थिक बळ देण्याचा विचार केला जात आहे हीसुद्धा अभिनंदनाची बाब आहे. इस्रो ही भारतीय अवकाश संशोधन संस्था असली तरी आता जागतिक पातळीवर तिचे नाव झाले असल्यामुळे जागतिक अवकाश संशोधनामध्ये सुद्धा इस्रोचे योगदान वाढत चालले आहे.
म्हणूनच अमेरिका या देशानेसुद्धा चांद्रयान मोहिमेचे तंत्रज्ञान इस्रोकडे मागितले आहे. आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या देशाच्या सहकार्याने किंवा त्या देशांच्या भूमीवरून अवकाश संशोधन किंवा अवकाशयान प्रक्षेपित करण्याचे काम करणाऱ्या भारताने आता संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय भूमीवरून हे सर्व यश मिळवले आहे. आतापर्यंत अनेक यशस्वी मोहिमा करून गगनभेदी यश मिळवले आहे. आता गगनयान या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातही यश प्राप्त करून त्यांनी आपल्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे, हे निश्चित.