राजस्थानात कॉंग्रेसवर सचिन पायलट यांच्या रूपाने मोठे संकट घोंगावताना दिसत होते. काल पायलट यांचे वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीचा दिवस होता. त्यानिमित्त सचिन पायलट यांनी त्यांच्या दौसा जिल्ह्यात राजेश पायलट यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त एका मोठ्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात आपण आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करू, असे त्यांनी आधीच घोषित केले होते. त्यामुळे सचिन पायलट हे यावेळी कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा करतील आणि स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करण्याची घोषणा करतील, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. परंतु त्यांनी अशी कोणतीही आगळीक करण्याची घोषणा या कार्यक्रमात केली नाही.
त्यामुळे कॉंग्रेसवरील राजस्थानातले एक मोठे संकट टळले आहे. हे जरी खरे असले तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची डोकेदुखी त्यामुळे कमी झाली आहे, असे मानता येणार नाही. सचिन पायलट कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याने गेहलोत यांना आता फार सुखासुखी राजकारण करता येणार नाही, हेही उघडच आहे. मध्यंतरी कॉंग्रेस श्रेष्ठींनी या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता करण्यासाठी बैठक घेतली होती. त्यात हा समझोता झाला असल्याचेच दिसून आले आहे. त्यामुळेच बहुधा सचिन पायलट यांनी कोणतीही आगळीक काल केली नाही. राजस्थानातील विधानसभेच्या निवडणुकीला आता जेमतेम चार-पाच महिन्यांचा कालावधी बाकी आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानातील पक्षाची एकी टिकवणे हे कॉंग्रेस श्रेष्ठींसाठी अवघड काम होते. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष सोडला असता, तर त्याचा विपरीत परिणाम कॉंग्रेसच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील निवडणुकीवरही झाला असता. कारण कोणत्याही एका मोठ्या गटाने पक्ष सोडणे ही पक्षासाठी नामुष्कीची बाब ठरते आणि पक्षाच्या निवडणुकीच्या यशापयशावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. या वर्षाच्या अखेरीला छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातही निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे सचिन पायलट यांनी दाखवलेल्या संयमामुळे कॉंग्रेस आता सुरक्षित स्थितीत राहिली आहे, असे म्हणता येईल. सचिन पायलट यांनी मध्यंतरी जी पदयात्रा काढली होती,
त्यात त्यांनी राजस्थानातील वसुंधराराजे सरकारच्या काळातील भ्रष्टाचार प्रकरणावर विद्यमान कॉंग्रेस सरकारने कारवाई करावी ही प्रमुख मागणी केली होती. अशोक गेहलोत हे वसुंधरा राजे यांना पाठीशी घालत आहेत, असे चित्र सचिन पायलट यांनी निर्माण केले होते. त्यामुळे वसुंधराराजे आणि भाजपच्या मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची प्रकरणे सचिन पायलट यांनी लावून धरली होती. त्यामुळे जरी सचिन पायलट यांनी कॉंग्रेसमध्ये बंड केले असते तरी त्याचा राजस्थानात भाजपला लाभ होण्याची शक्यता धूसर होती. कारण जसा सचिन पायलट यांचा अशोक गेहलोत यांना विरोध आहे तसाच त्यांचा भाजपलाही विरोध आहे, ही बाब त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. सचिन पायलट यांना भाजपमध्ये घेऊन भाजपमधील बलाढ्य नेत्यांना नाराज करणे, हेही भाजपला परवडणारे नव्हते. कालच्या आपल्या मेळाव्यात सचिन पायलट यांनी आपला लोकांसाठीचा संघर्ष कायम राहील आणि आपल्या मागण्यांच्या संबंधातील लढा सुरूच राहील, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यांनी स्पर्धा परीक्षांतील पेपर फुटीच्या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी, याचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत गेहलोत यांच्या सरकारवरील दबाव कायम ठेवला आहे. त्याच वेळी त्यांनी भाजप सरकारच्या काळातील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई व्हावी, ही आपली भूमिकाही कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही बाजूंवरील आपला दबाव कायम ठेवत आपण आज संयम बाळगत असलो तरी भविष्यात हेच मुद्दे पुढे करून वेगळी चूल मांडण्याचा गर्भित इशाराही कायम ठेवला आहे. सध्या या तीन राज्यांच्या संबंधात विविध खासगी संस्थांकडून जनमत चाचण्या आजमवल्या जात आहेत. त्यानुसार राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेसची स्थिती मजबूत असल्याचे दिसून आले आहे. राजस्थानातही कॉंग्रेसचे सरकार पुन्हा परतण्याची शक्यता या चाचण्यांमधून ध्वनित करण्यात आली आहे. राजस्थानात भाजप अजूनही फारसा सक्रिय दिसत नाही, याचे कारण भाजपच्या प्रमुख नेत्या वसुंधराराजे अजून प्रचारासाठी बाहेर पडलेल्या किंवा सक्रिय झालेल्या दिसत नाहीत.
त्यांचेही भाजप श्रेष्ठींशी वाकडे आहे. त्या थेट भाजपश्रेष्ठींनाच आव्हान देण्याची भूमिका घेऊ शकतात, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या मागे भाजप नेत्यांचा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे राजस्थानात नेमके काय करावे अशा विवंचनेत भाजपश्रेष्ठी आहेत. त्यांना सचिन पायलट यांच्या मध्ये नवीन आशेचा किरण दिसू लागला होता. पण तुर्तास तरी त्याला ब्रेक लागलेला दिसतो आहे. अशोक गेहलोत यांना राजकारणातले जादुगार म्हणतात. त्यांनी त्या महत्त्वाच्या राज्यात पक्षांतर्गत विरोधकांसाठी आणि भाजपसाठी अशी चमत्कारिक स्थिती निर्माण करून ठेवली आहे की, त्यांच्यातील कोणालाही आज गेहलोत यांच्यामुळे कोणतीही ठोस भूमिका घेता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळेही कदाचित सचिन पायलट यांनाही आज थोडे नमते घ्यावे लागले असावे, असा कयास लावता येतो. मध्यंतरी आम आदमी पक्षानेही पायलट यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणतात.
पण या एकदमच नवीन पक्षात प्रवेश करून संपूर्ण राज्यात स्वत:ची हुकुमत प्रस्थापित करणे हे अवघड काम आहे आणि पुढील चार-पाच महिन्यांत ते करता येणे शक्य नाही, स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करणे म्हणजे स्वत:चे हसेच करून घेण्यासारखे आहे, ही बाब ओळखून सचिन पायलट यांनी आज संयमी भूमिका घेतलेली दिसते आहे. त्यांना मोठे राजकीय करिअर करायचे असेल तर कॉंग्रेस मध्येच राहून ते करता येईल याचे भान त्यांनी ठेवले आहे. अशोक गेहलोत यांच्या तुलनेत पायलट यांच्याकडे वयाची जमेची बाजू आहे. त्यामुळे भविष्यातील मोठ्या वाटचालीसाठी त्यांनी आज एक पाऊल मागे घेण्याचा जो सूज्ञ निर्णय घेतला आहे तो अपेक्षित असाच होता.