आतापर्यंत तीनदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवलेले नवाझ शरीफ हे चार वर्षांनंतर नुकतेच मायदेशी परतले आहेत. देशातून हद्दपार केले गेल्यानंतर त्यांनी चार वर्षे लंडनमध्ये काढली. आता स्वदेशी परतल्यावर त्यांनी तातडीने लाहोरमध्ये एक जाहीर सभाही घेतली. पंतप्रधानपदी असताना नवाझ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आणि लष्कराच्या मनातूनही ते उतरले. त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागले. सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी ते ब्रिटनमध्ये गेले. पाकिस्तानातील न्यायव्यवस्थाही अजब असून, सजा ठोठावली गेल्यानंतरदेखील अतिमहत्त्वाची व्यक्ती आरोपी असेल, तर ती विदेशात जाऊन मजेत राहूदेखील शकते. शिवाय लष्कराची मर्जी कधी कोणावर बसेल आणि कधी उतरेल, हे सांगता येत नाही. 2019च्या काही काळ आधी लष्कराला इम्रान खान हे पसंत पडले आणि ते पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांच्यावरही अनेक आरोप ठेवले जाऊन, त्यांचीही रवानगी तुरुंगात करण्यात आली.
अमेरिकेने कारस्थान करून आपल्याला पंतप्रधानपदावरून हाकलले, असा आरोप इम्रान यांनी केला होता. तरीदेखील इम्रान यांच्याबद्दल पाकिस्तानात सहानुभूती असून त्यांची लोकप्रियता वाढूही शकते. सार्वत्रिक निवडणुका झाल्यास इम्रान व त्यांच्या पक्षाला सतेत येण्यापासून रोखण्यासाठी लष्कर नवाझ यांच्यामागे उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही वर्षांपूर्वी “पनामा पेपर्स’ बाहेर आल्यानंतर, नवाझ यांनी परदेशात प्रचंड संपत्ती बनवली असून, लंडनमध्ये त्यांनी घरही खरेदी केल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाने तर त्यांनी राजकारणात सक्रिय होण्यावरच कायमची बंदी घातली आहे. त्यांना सरकारचे कोणतेही पद स्वीकारता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत; परंतु तरीही पाकिस्तानात कुछ भी हो सकता है… नवाझ यांना भारताशी सलोख्याचे संबंध असावेत, असे वाटत होते; परंतु लष्कराचा त्यास विरोध होता. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी लाहोर बसयात्रा केली.
तेव्हा नवाझच पंतप्रधान होते. मात्र, त्यानंतर कारगिलमध्ये पाकिस्तानाने घुसखोरी केली, तेव्हा परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख होते. मुशर्रफ यांनी यथावकाश बंड करून सत्ता हातात घेतली आणि शरीफ यांना तुरुंगात टाकले. त्यानंतर शरीफ यांनी देशांतर करून जेद्दा गाठले. पुढच्या टप्प्यात शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान झाले, तेव्हा पठाणकोट व उरी येथे पाक लष्कराने अतिरेकी हल्ले केले. त्यावरून शरीफ आणि पाकिस्तानी लष्कर यांचे मतभेद झाले होते. शरीफ यांच्या सुदैवाने आता इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देणारा जामीन मंजूर केला आहे. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे नेतृत्व सध्या त्यांचे बंधू व माजी पंतप्रधान शहबाझ शरीफ हे करत आहेत. एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 या काळात शाहबाझ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते; परंतु शाहबाझ हे कोणत्याही अर्थाने लोकप्रिय नेते नाहीत. उलट नवाझ यांच्या नावाचा देशभर दबदबा आहे. पाकिस्तानात महागाई आकाशाला भिडली असून इंधन, वीज आणि अन्नधान्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. भारत चंद्रावर पोहोचला आहे.
भारताने यशस्वीरीत्या जी20 शिखर परिषदेचे आयोजन केले. तर पाकिस्तानला जगभरातून पैशाची भीक मागावी लागत आहे, अशी टीका नवाझ शरीफ यांनी मागच्याच महिन्यात केली होती. वाजपेयी पंतप्रधान झाले, तेव्हा भारताकडे फक्त एक अब्ज डॉलरची गंगाजळी होती. आता ती 600 अब्ज डॉलर झाली आहे, याकडेही नवाझ यांनी लक्ष वेधले होते. अनेक वर्षांपूर्वी नवाझ यांच्या राजकीय प्रतिस्पर्धी बेनझीर भुट्टो यांनाही अशाच पद्धतीने परदेशात जावे लागले होते आणि मुशर्रफ यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतरच त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता; परंतु त्यानंतर धक्कादायकरीत्या बेनझीर यांची हत्या झाली आणि त्या कटामधील एक सूत्रधार मुशर्रफ असल्याचेही बोलले जात होते. बेनझीर जेव्हा देशात परतल्या, तेव्हा मुशर्रफ यांच्यासारखा लष्करी हुकूमशहा सत्तेवर होता.
पाकिस्तान पीपल्स पार्टीशी चर्चा करा, असे लष्कराच्या एका गटानेच मुशर्रफ यांना सुचवले होते. त्यामुळे तसे करणे त्यांना भाग पडले. सध्या जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असून, थेट सत्तेवर बसण्यापेक्षा अप्रत्यक्ष नियंत्रण असावे, असे त्यांचे मत असल्याचे दिसते. इम्रान यांचे जनमानसात स्थान असले, तरीदेखील इजिप्तमधील तहरीर चौकात ज्याप्रमाणे लष्करशाहीविरुद्ध लोक रस्त्यावर आले, त्या ताकदीचे आंदोलन अद्याप इम्रान यांचा पक्ष करू शकलेला नाही. लष्कराबरोबर तडजोड करूनच नवाझ हे पाकिस्तानात परतले असून, त्यामुळे त्यांना सत्तेत येण्यासाठी वा तेथे टिकून राहण्यासाठी समझोतेच करावे लागणार आहेत, हे सामान्यांनाही माहीत झाले आहे. गेल्या काही वर्षांत पाक लष्कराने सरकारच्या सर्व यंत्रणांत चंचूप्रवेश केला असून, नॅशनल अकाउंटॅबेलिटी ब्यूरो (नॅब), नॅशनल डाटाबेस अँड रजिस्ट्रेशन ऍथॉरिटी यासारख्या महत्त्वाच्या संस्थांही निवृत्त लष्करी अधिकारी चालवत आहेत. भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे नॅबकडे असतात. त्यामुळे मुळात पंतप्रधानाचे अधिकारच मर्यादित झाले आहेत.
पुढील वर्षारंभी पाकिस्तानात निवडणुका होणार असून, अखेर कोण पंतप्रधान होईल, हे काही सांगता येत नाही. नवाझ यांचे मुख्य प्रतिस्पर्धी इम्रान असले, तरी त्यांना अपात्र घोषित करण्यात आले असून, त्यांचा पाकिस्तान तेहरीर-ई-इन्साफ पक्ष दुबळा झालेला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुट्टो हे लष्कराच्या पसंतीचे नेते नाहीत. मुळात नवाझ यांची स्पर्धा त्यांचे बंधू शाहबाझ यांच्याशीच आहे. शाहबाज हे लष्कराचे लाडके आहेत. नवाझ यांच्यामागे जनशक्ती असली, तरी लष्करी शक्ती शाहबाझ यांच्यामागे आहे. शिवाय नवाझ यांची कन्या मरयम आणि पुतण्या हमझा (म्हणजे शाहबाझ यांचे चिरंजीव) असे दोन गट पक्षात पडले असून, पक्षात एकजूट निर्माण करण्याचे मोठे आव्हान नवाझ यांच्यासमोर आहे. मुळातच नवाझ यांचा पक्षच घराणेशाहीवर चाललेला असून, एकप्रकारे तीच त्याची मर्यादा आहे. परंतु पाकिस्तान पीपल्स पार्टीसारखा पक्षही घराणेशाहीच्या पलीकडे पाहण्यास तयार नाही, हे त्या देशातील जनतेचे दुर्दैव आहे.