चिरंतन विकासाच्या तत्त्वावर कोणत्याही देशाचा विकास करत असताना नेहमीच पर्यावरण आणि विकास याचा समतोल कसा साधायचा याबाबत चर्चा केली जाते. आता अमेरिकेतील डेलावेअर आणि वोमिंग विद्यापीठाने केलेल्या संशोधनातील जो एक ताजा अहवाल प्रसिद्ध झाला आहे त्याप्रमाणे आगामी कालावधीमध्ये मानवाला जर सुरक्षित जीवन जगायचे असेल, तर नगररचनेला सर्वात जास्त महत्त्व द्यावे लागणार आहे. एकीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे नगरांचा आणि महानगरांचा विकास जरी टाळता येत नसला, तरी हा विकास करत असताना जर नगररचनेला योग्य महत्त्व देण्यात आले तर नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळू शकेल, असा महत्त्वाचा संदेश या अहवालात देण्यात आला आहे.
केवळ अमेरिका नव्हे तर भारतासारख्या अनेक महत्त्वाच्या देशांनी या नगररचनेच्या विषयाकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणामध्ये टोकाचे बदल होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी अतिवृष्टी किंवा तत्सम नैसर्गिक संकटांशी सामना करावा लागतो. या संकटांशी सामना करताना एखादे शहर किंवा नगर कशाप्रकारे बसवण्यात आले आहे हे महत्त्वाचे ठरणार आहे. एखाद्या शहरातील इमारतींची कशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे किंवा त्या शहरातील नागरी वसाहतींचा कोणत्या पद्धतीने विस्तार झाला आहे किंवा जे नवनवीन गृहप्रकल्प होत आहेत ते तेथील वातावरणाशी सुसंगत आहेत का, या बाबी आगामी काळात महत्त्वाच्या ठरतील असे या संशोधनात म्हटले आहे.
त्याची दखल भारतातील सर्वच शहरातील विकसकांनी आणि नगर रचनाकारांनी घेण्याची गरज आहे. शहराचा आकार महत्त्वाचा न मानता शहर छोटे असो किंवा मोठे असो त्या शहराची रचना कशा प्रकारे केली जात आहे त्या आधारे नैसर्गिक आपत्तींशी सामना करता येणार आहे, हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतासारख्या देशामधील महानगरांमध्ये आणि छोट्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प आणि इतर प्रकल्प वाढत असताना या प्रकल्पांच्या बांधकामावर थोडाफार प्रमाणात निर्बंध घातले जावेत, अशा प्रकारचा एक मतप्रवाह समोर येत असतानाच आता या बांधकामांच्या संख्येपेक्षाही त्या शहराची रचना कशा प्रकारे करण्यात आली आहे ते जास्त महत्त्वाचे मानण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील अनेक शहरांना अतिवृष्टीचा किंवा महापुराचा जो तडाखा बसला त्याला कारणीभूत चुकीची नगररचनाच आहे हे आता मान्य करावे लागेल. कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे सुद्धा अनेक महानगरात पाणी रस्त्यावर येते आणि पूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जाते. अतिवृष्टी झाली तर अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती जरी समजण्यासारखी असली तरी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यावरसुद्धा जर सखल भागात पाणी साठून जनजीवन विस्कळीत होत असेल तर त्याला जबाबदार ही नगररचनाच आहे हे उघड आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये नद्या मागे सारून किंवा ओढे बंद करून त्यावर इमारती उभ्या राहिल्या आहेत.
त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. दुसरीकडे, आधुनिक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असल्याने आणि त्यातही प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ड्रेनेज व्यवस्थासुद्धा विस्कळीत झाली आहे. त्याचाही मोठा फटका पावसाळी हंगामाच्या कालावधीमध्ये शहरांना बसतो. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करेल अशा प्रकारे ड्रेनेज व्यवस्था विकसित न झाल्यामुळे सुद्धा नैसर्गिक आपत्ती निर्माण होताना दिसत आहेत. कोणत्याही शहरातील नागरिकांसाठी ज्या विविध सोयी सुविधा पुरवल्या जातात तो या नगर रचनेचाच भाग असतो. विद्युत पुरवठा असेल किंवा ड्रेनेज व्यवस्था असेल किंवा पाणीपुरवठा असेल या सर्व महत्त्वाच्या विषयांची रचना कशा प्रकारे करण्यात आली आहे हे जास्त महत्त्वाचे ठरते.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये जेव्हा नगरांमध्ये आणि महानगरांमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले किंवा बहुमजली इमारती उभ्या राहिल्या किंवा सहापदरी रस्ते आणि उंच उड्डाण पूल उभे राहिले त्यानंतरच अनेक शहरांमध्ये पावसाळ्यात पाणी भरण्यासारखे प्रकार सुरू होऊन जलकोंडी होत आहे. कोणत्याही शहराच्या किंवा राज्याच्या किंवा देशाच्या विकासासाठी अशा प्रकारचे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असतात; पण अशा प्रकारचे प्रकल्प उभारताना नगररचनेच्या मुख्य तत्त्वाकडे दुर्लक्ष झाल्यानेच नैसर्गिक आपत्तीची तीव्रता वाढते, असे या अमेरिकेतील संशोधनाने समोर आले आहे. या नव्या संशोधनाचे आणखीन एक महत्त्व यासाठी आहे की या संशोधनामध्ये कोठेही बांधकामावर निर्बंध आणावेत असे म्हणण्यात आलेले नाही. फक्त ही बांधकामे करत असताना नगररचनेच्या मूलभूत तत्त्वाचा वापर करून जर प्रकल्पांची उभारणी करण्यात आली तर नैसर्गिक आपत्तीची तीव्रता कमी होऊ शकते, असे म्हटले आहे.
पर्यावरणाशी सुसंगत अशा प्रकारे जर नगररचना करण्यात आली तर नैसर्गिक आपत्तींची तीव्रताही कमी होऊ शकते आणि दरवर्षी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाणही कमी होऊ शकते. कोणत्याही शहरांमध्ये एखाद्या बांधकाम प्रकल्पाची जेव्हा परवानगी मागण्यात येते तेव्हा नेहमीच मूलभूत नगररचना तत्त्वांचे पालन झाले आहे की नाही हे पाहिले जाते किंवा तसे पाहिले गेले असे गृहीत धरले जाते; पण अशा प्रकारची परवानगी देताना जर पुरेसे गांभीर्य पाळले गेले नसेल तर त्याचा फटका नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर बसू शकतो हे आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे. एकीकडे बहुमजली इमारतींचे टॉवर, उंच उंच उड्डाणपूल आणि बहुपदरी रस्ते जरी एखाद्या शहराच्या विकासाचे निदर्शक असले तरी विकासाचे हे घटकच नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये अनेकवेळा मारक ठरू शकतात याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
चिरंतन विकासाच्या तत्त्वाप्रमाणे भविष्यातील पिढीच्या अस्तित्वाचा विषय प्राधान्याने लक्षात घेतला जातो. असाच विचार करून आगामी कालावधीमध्ये कोणत्याही शहरामध्ये विकासाचे प्रकल्प उभारत असताना नगररचनेच्या या तत्त्वाला महत्व द्यावे लागणार आहे. कोणत्याही नगराला किंवा महानगराला दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसल्यावर पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणावर जो निधी खर्च करावा लागतो त्याचा विचार करता आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार न होण्याचीच काळजी घेणे कधीही चांगले. या तत्त्वाच्या आधारेच आगामी कालावधीमध्ये नगरांची रचना करावी लागणार आहे. पर्यावरणाशी सुसंगत पद्धतीनेच विकास करावा लागणार आहे.