भारत यजमान असलेल्या जी20 शिखर परिषदेचा समारोप झाला आणि या परिषदेमध्ये दोन दिवस झालेल्या विविध चर्चांमध्ये जगाला सतावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या विषयांचा ऊहापोह करण्यात आला. या निमित्ताने जे दिल्ली घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याचे महत्त्व निश्चितच अधोरेखित होत आहे. ज्या परिस्थितीत आणि जागतिक अस्थिर वातावरणामध्ये ही शिखर परिषद झाली होती. त्या पार्श्वभूमीवर या दिल्ली घोषणापत्रामध्ये जे विविध निर्णय सांगण्यात आले आहेत ते निश्चितच महत्त्वाचे आहेत आणि आगामी कालावधीमध्ये जगाच्या राजकारणाला आणि समाजकारणाला दिशा देण्याचे काम करणार आहेत. जेव्हा कोणत्या देशामध्ये अशा प्रकारची एखादी जागतिक शिखर परिषद होते तेव्हा सहभागी सदस्य असे एखादे घोषणापत्र तयार करून ते जाहीर करत असतात. आतापर्यंत अशाप्रकारची अनेक घोषणापत्रे जाहीर झाली असून त्या आधारेच जगाचा कारभार सुरू ठेवण्यात आला आहे.
आता या घोषणापत्रामध्ये भारताच्या पुढाकाराने तयार झालेल्या दिल्ली घोषणापत्राचाही समावेश झाला आहे. ज्या प्रकारे सर्व सहभागी सदस्यांनी टाळ्या वाजवून या घोषणापत्राचे स्वागत केले ते पाहता आगामी कालावधीमध्ये निश्चितच या घोषणापत्रातील विषय महत्त्वाचे ठरणार आहेत. जी20 संघटनेचे सदस्य असलेल्या रशिया आणि चीन या देशांच्या प्रमुख प्रतिनिधींनी जरी या शिखर परिषदेला हजेरी लावली नसली, तरी दिल्ली घोषणापत्रामध्ये ज्या प्रकारे वसाहतवादाला आणि विस्तारवादाला विरोध करणाऱ्या काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत त्याचे स्वागत करावे लागेल. या घोषणापत्रात अत्यंत स्पष्टपणे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा उल्लेख करण्यात येऊन आगामी कालावधीमध्ये कोणीही आण्विक युद्धाची धमकी देऊ नये, असे सूचित करण्यात आले आहे. या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकन युनियनला संघटनेचे सदस्य बनवण्यात आले.
साहजिकच आफ्रिकन युनियनचे सदस्य असलेले 55 देश आपोआपच जी20 संघटनेशी जोडले गेले आहेत. म्हणजेच आता जी20 ही जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची संघटना ठरते. ज्या देशाकडे अशा प्रकारच्या जागतिक शिखर परिषदेचे यजमानपद असते त्या देशाला एखादा फायदा व्हावा अशा प्रकारचे निर्णय अशा शिखर परिषदांमध्ये नेहमीच घेतले जातात आणि या शिखर परिषदेमध्येसुद्धा भारतासाठी “मसाला मार्गा’ची निर्मिती हा महत्त्वाचा विषय ठरणार आहे. युरोप मध्यपूर्व आशिया आणि भारताला जोडणाऱ्या आधुनिक काळातील “मसाला मार्गा’च्या निर्मितीचा निर्धार या दिल्ली घोषणापत्रात करण्यात आल्याने भारताच्या पुढाकारानेच या सर्व विकासात्मक बाबींची अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त ठरणार आहे. या “मसाला मार्ग’ योजनेप्रमाणे भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया, युरोपीय महासंघ आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या पुढाकारातून रेल्वे मार्ग, बंदरे, वीजपुरवठा आणि इंटरनेट सुविधा या पायाभूत विषयांवर काम केले जाणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी या पुढाकाराचे “बिग डील’ अशा शब्दात कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात वैश्विक जैवइंधन आघाडीचीसुद्धा घोषणा केली. पर्यावरणाला त्रास न देणाऱ्या पर्यावरणपूरक अशा इंधनाच्या निर्मितीसाठी आगामी कालावधीमध्ये पायाभूत संशोधन केले जावे, असे या निमित्ताने भारताने सुचवले आहे. मोदी यांनी जी20 संघटनेसाठी सॅटॅलाइट मिशनचीही घोषणा केली आहे. इस्रो संघटनेतर्फे अशा प्रकारचे सॅटॅलाइट मिशन राबवले जाऊ शकते, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांचे प्रतिनिधी आणि प्रमुख या शिखर परिषदेला उपस्थित असल्याने आपोआपच दिल्ली घोषणापत्रामध्ये ज्या बाबी ठरवण्यात आल्या आहेत त्यांची अंमलबजावणी त्या त्या देशाच्या पातळीवर व्यवस्थित होणार आहे. या व्यतिरिक्त यजमान भारताने संघटनेचे सदस्य नसलेल्या इतर काही मित्र देशांना या परिषदेसाठी प्राचारण केले होते. त्या देशांनासुद्धा या परिषदेतील निर्णयांचा फायदा होणार आहे.
याच निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी जगातील विश्वासाचा अभाव संपवण्याचे जे आवाहन सर्व नेत्यांना केले आहे तेसुद्धा महत्त्वाचे आहे. रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सध्या जे युद्ध सुरू आहे त्यानिमित्ताने आपोआपच जगामध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची आणि अविश्वासाची भावना तयार झाली आहे. ही भावना कमी करण्यासाठी आणि संपवण्यासाठी जी20 संघटनेचे नेते निश्चितच प्रयत्न करू शकतात असेच अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांनी सुचवले आहे. “वसुधैव कुटुम्बकम’ या ब्रीद वाक्याखाली झालेल्या या शिखर परिषदेमध्ये भारताने अत्यंत आग्रहाने “वन अर्थ’ ही संकल्पनासुद्धा मांडली आहे. म्हणजे जगातील सर्वच देशांनी एकत्र काम करून जगाला भेडसावणाऱ्या समस्यांचा अंत करायला हवा. आपण सर्व एकाच पृथ्वीवर राहणारे असल्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे विचार करून आपले भविष्य घडवायला हवे, हाच विचार भारताने या व्यासपीठावर मांडला.
भारताने ज्या नियोजनबद्ध पद्धतीने ही शिखर परिषद आयोजित केली आणि अमलातही आणली ते पाहता केवळ एक वार्षिक कर्मकांड म्हणून या शिखर परिषदेकडे पाहिले जाऊ नये, असा संदेशच भारताने संपूर्ण जगाला विशेषत: जी20 संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना दिला आहे. या निमित्ताने भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जगातील प्रमुख नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची संधीही नरेंद्र मोदी यांना उपलब्ध झाली. या शिखर परिषदेतील महत्त्वाचे निर्णय अधोरेखित करणारे दिल्ली घोषणापत्र प्रकाशित करण्यात आले आहे ते पाहता भारताने आयोजित केलेली ही शिखर परिषद निश्चितच यशस्वी झाली, असे म्हणता येऊ शकते.