आणखी दोन महिन्यांच्या कालावधीत होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आघाडीकडून जाहिरातबाजीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असतानाच भाजपा आघाडीला आव्हान निर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीतील विविध घटक पक्षांनी अनेक राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत चांगली प्रगती केलेली दिसते. सत्ताधारी भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेल्या अनेक पक्षांसोबत भाजपाने अद्यापपर्यंत कोणतीही जागा वाटपाची योजना जाहीर केली नसली, तरी ‘इंडिया’ आघाडीतील काही प्रमुख पक्षांनी मात्र आपापसात चर्चा करून काँग्रेसबरोबर प्रमुख राज्यांमध्ये जागा वाटप अंतिम केले आहे, हे निश्चितच महत्त्वाचे आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर जागावाटप समझोता केला असून त्यामध्ये उत्तर प्रदेशातील 80 जागांपैकी 17 जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे.
त्या पाठोपाठ आता दिल्ली, पंजाब यासारख्या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षानेही काँग्रेसबरोबर समझोता केला असून दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये जागावाटप जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे राज्य असलेला महाराष्ट्रामध्येसुद्धा महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू असून त्याला 27 फेब्रुवारी रोजी अंतिम रूप मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये समाजवादी पक्ष मध्यप्रदेशमध्येसुद्धा काँग्रेसबरोबर जागावाटप समझोता करण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली इंडिया आघाडी ही विस्कळीत आघाडी आहे, अशा प्रकारची टीका जरी सातत्याने भाजपकडून केली जात असली तरी जागावाटप तडजोडीमध्ये मात्र इंडिया आघाडीने खूपच मजल मारली आहे, हे भाजपालाही नाकारून चालणार नाही.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ज्या प्रकारे समन्वयाची भूमिका घेऊन काँग्रेसबरोबर विविध राज्यांमध्ये जागावाटप तडजोड केली आहे ती खरोखरच महत्त्वाची ठरणार आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील सात जागांपैकी चार जागा आम आदमी पक्ष आणि तीन जागा काँग्रेस पक्ष लढवणार आहे, तर गुजरातमध्येही 26 जागांपैकी काँग्रेसने 24 स्वतःकडे ठेवल्या असून दोन जागा आम आदमी पक्षाला दिल्या आहेत. दिल्लीतील या सात जागा नेहमीच महत्त्वाच्या ठरतात. कारण दिल्लीतील मतदार एकतर्फी कौल देत असतात. कधी सर्व 7 जागा काँग्रेस जिंकत असते, तर कधी सर्व जागा भाजपने जिंकल्याचा इतिहास आहे. पण आम आदमी पक्षाचा दिल्लीच्या राजकारणामध्ये उदय झाल्यानंतर या पक्षाचीही ताकद वाढली असल्याने आणि दिल्ली विधानसभामध्ये आम आदमी पक्षाची सत्ता असल्याने काँग्रेससाठी दिल्लीमधील ही जागावाटप तडजोड फायद्याची ठरणार आहे.
मात्र भाजपासाठी निश्चितच आव्हान निर्माण होणार आहे. आतापर्यंंत दिल्लीमध्ये भाजपाचा फायदा एकाच कारणाने होत होता तो म्हणजे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे मतदार एकाच विचाराचे असल्यामुळे जेव्हा जेव्हा तिरंगी निवडणुका झाल्या तेव्हा तेव्हा भाजपाचा फायदा होताना दिसला आहे. पण आता दिल्लीसारख्या महत्त्वाच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आप आणि काँग्रेस एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याने या सात जागांबाबत भाजपासाठी निश्चितच आव्हान निर्माण होणार आहे. दहा वर्षे जरी केंद्रात भाजपचे सरकार असले तरी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेमध्ये मात्र भाजपाला सत्ता मिळवता आलेली नाही. तशीच परिस्थिती तेथील महानगरपालिका आणि इतर स्थानिक संस्थांमध्येसुद्धा आहे. म्हणजे दिल्ली ही भारताची राजधानी असली तरी आपने तेथे आपले नेटवर्क मोठ्या प्रमाणात मजबूत केले आहे. साहजिकच येथील लोकसभेच्या सातही जागा हा भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे.
आप आणि काँग्रेस यांच्या या जागावाटप समझोत्यामुळे जे आव्हान निर्माण झाले आहे ते परतवून लावण्यासाठी भाजपाला एखाद्या वेगळ्याच रणनीतीची गरज भासणार आहे. अत्यंत प्रभावशाली आणि जिंकून येण्याची हमी असणारे उमेदवार देण्याचा विचारच या केंद्रशासित प्रदेशामध्ये भाजपाला करावा लागणार आहे. गुजरातसारख्या राज्यामध्ये नेहमीच काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत असते. या राज्यामधील कौलही नेहमीच एकतर्फी जात असतो. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्येसुद्धा मतदारांचा एकतर्फी कौल भाजपाच्या बाजूने होता. गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसची या राज्यामध्ये कामगिरी बर्यापैकी सुधारली असल्याने आणि आता आम आदमी पक्षाबरोबर जागावाटप तडजोड झाली असल्याने या राज्यामध्ये शंभर टक्के यश मिळवण्याची खात्री भाजप देऊ शकतो की नाही, याबाबत शंका निर्माण होऊ शकते. हरियाणा आणि गोव्यामध्येसुद्धा काँग्रेस आणि आप हे भाजपाला आव्हान निर्माण करू शकतात.
या दोन पक्षांची या छोट्या राज्यांमध्ये युती झाल्यामुळे भाजपविरोधी जी पारंपरिक मते आहेत ती फुटण्याचा धोका खूपच कमी होणार आहे. आप, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी पुढाकार घेऊन काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये अशाप्रकारे जागावाटप तडजोड केली असल्याने आता पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये ममता बॅनर्जी आणि इतर काही राज्यांमधील प्रमुख नेते यांनी जर तडजोडीची भूमिका घेतली तर त्या राज्यांमध्येसुद्धा जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊन भाजपला आव्हान निर्माण करण्याची परिस्थिती तयार होऊ शकते. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट यांच्यामध्ये जरी आघाडी असली तरी योग्य जागावाटप समझोता झाला तरच महाराष्ट्रातही भाजपला आव्हान निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्रात सत्तेवर असलेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत अद्यापही चर्चा सुरू झालेली नाही. पण याबाबत निश्चितच काही कुरबुरी सुरू झाल्या आहेत. त्या लक्षात घेऊन त्याचा फायदा व्हावा म्हणून महाविकास आघाडी जागा वाटपामध्ये आघाडी घेते का, हेही पहावे लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची अपेक्षा भाजप आघाडीने बाळगली असली तरी ही अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये इंडिया आघाडीची ही एकजूट निश्चितच अडथळा ठरणार आहे. इंडिया आघाडी ही आंतरविरोधाने आणि परस्पर विरोधी मतांनी युक्त अशी आघाडी आहे अशी टीका जरी भाजपकडून नेहमी केली जात असली तरी इंडिया आघाडीचे विविध पक्ष ज्या प्रकारे जागा वाटपामध्ये प्रगती करत आहेत त्याची गंभीर दखल भाजप आघाडीला घ्यावीच लागणार आहे.