15 हजारांहून अधिक गावांना 6 हजार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
मुंबई – राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून 4920 गावे व 10506 वाड्यांमध्ये 6209 टॅंकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तर राज्यात शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या व लहान जनावरांसाठी दीड हजार चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या मदतीचे वाटप करण्यासह विद्युत शुल्कात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी, कर्जवसुलीस स्थगिती अशा सर्व आघाड्यांवरील उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.
राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.
राज्यात सध्या 6209 टॅंकर्सच्या माध्यमातून 4920 गावे आणि 10 हजार 506 पाड्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे. राज्यात नाशिक, पुणे, औरंगाबाद विभागात एकूण 1501 चारा छावण्या सुरू आहेत. त्यामध्ये सुमारे 10 लाख 4 हजार 684 जनावरे आहेत. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना 111 कोटी, पुणे 4 आणि नाशिक विभागीय आयुक्तांना 47 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
जनावरांच्या देखरेखीसाठी शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या प्रमाणावर छावण्यांमध्ये उपस्थित असतात. अशावेळी महिलांसाठी त्याठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे उभारावीत, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. ज्यांना शेतीच्या कामासाठी बैल दिवसभरासाठी न्यायचा आहे,त्यांना ते घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्यात लहान व मोठ्या जनावरांसाठी छावण्या आहेत मात्र शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात प्रथमच छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी आता पर्यंत 34 लाख शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.