काझिरांगा (आसाम) – आसाममध्ये आलेल्या पुरामुळे रविवारपर्यंत काझिरांगा अभयारण्यातील 108 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 9 गेंड्यांचा समावेश आहे. 136 प्राण्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे. काझिरांगा अभयारण्याचे संचालक शिव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
पुराचे पाणी काझिरांगा अभयारण्यामध्ये घुसल्यामुळे प्राण्यांनी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जवळच्या टेकडीवर आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक प्राण्यांनी जवळच्या टेकड्यांवर आश्रय घेतला असला तरी अनेक प्राण्यांना पाण्याच्या प्रवाहातून स्वतःला वाचवणे जमलेले नाही.
या प्राण्यांना सुरक्षित आश्रय मिळू न शकल्यामुळे त्यांचा जीव गेल्याची शक्यता अधिक आहे. पुराचे पाणी आता ओसरत असले तरी पुरात मरण पावलेल्या प्राण्यांची संख्या अधिक वाढणे शक्य असल्याचेही शिव कुमार यांनी सांगितले.
काझिरांगा अभयारण्यातील परिस्थिती आता सुधारत असून अभयारण्याचा 80 टक्के भाग अजूनही जलमय आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीला ओलांडून जवळच्या टेकड्यांवर आश्रय घेतलेल्या गेंड्यांनीही आता अभयारण्यात परत यायला सुरुवात केली आहे. पुरामध्ये मरण पावलेल्या प्राण्यांमध्ये 9 गेंडे, 4 रामगवे, 7 अस्वले, 2 हरणे आणि 82 काळविटांचा समावेश आहे.